-अमित डोंगरे
ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू, सलामीवीर फलंदाज आणि सध्याचा त्यांचा मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर इतका कसा बदलला याचे आश्चर्य वाटू लागले आहे. द मोस्ट सेन्सिबल क्रिकेटर ऑफ ऑस्ट्रेलिया, असे त्याला संबोधले जायचे. तोच आता अचानक भारतीय संघाबाबत माइंड गेम खेळू लागला आहे. भारतीय क्रिकेट संघ म्हणजे टवाळखोर मुलांचा संघ असे वक्तव्य करत त्यानेही अखेर आपला टीपीकल ऑस्ट्रेलियन स्वभाव सिद्ध केला.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यापासून लॅंगर आपली मुक्ताफळे उधळत आहे. एकदिवसीय तसेच टी-20 मालिका झाली. त्यानंतर ऍडलेडची पहिली कसोटीही पार पडली. त्यानंतर भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेवर मायदेशी परतला आणी लॅंगरच नव्हे तर त्यांच्या आजी-माजी खेळाडूंसह त्यांच्या माध्यमांनाही कंठ फुटला.
भारतीय संघाचा दर्जाच खालावला आहे, संघात एकही जबाबदार खेळाडू नाही. हा संघ म्हणजे टवाळखोर मुलांचा संघ अशी अनेक विधाने केली गेली. अर्थात हा ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध माइंड गेम आहे हे सांगायला कोणाची गरज नाही. हे असलेच उद्योग ते गेली अनेक वर्षे करत आहेत. त्यातही त्यांना सर्वात जास्त धोका भारतीय संघाकडूनच असतो, त्यामुळे ते भारतात आले काय किंवा भारतीय संघ तीथे गेला काय ते संघाचे मनोबल खच्ची करण्यासाठी ही असली निरर्थक बडबड ते करतच असतात. बालिश बहू बायकांत बडबडला याच धर्तिवर बालिश लॅंगर ऑस्ट्रेलियात बडबडला असेच म्हणावे लागेल.
काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या जागतिक वर्चस्वाला जर कोणी धक्का दिला असेल तर तो केवळ भारतीय संघाने. गेल्या दोन दशकांपेक्षाही जास्त काळ भारतीय संघ सातत्याने ऑस्ट्रेलियावर भारी पडत आहे. मात्र, तरीही त्यांची खोड जात नाही. मार्क वॉ, शेन वॉर्न, मार्क टेलर, ऍलन बॉर्डर, ग्लेन मॅकग्रा, डॅरेन लेहमन, टॉम मुडी आणि संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाच्या पराभवाबाबतच मते व्यक्त केली.
या यादीत मांजेरकर यांचे नाव घेण्याचे कारण म्हणजे हा माणूस भारतीय वंशाचा परदेशी व्यक्ती असल्या सारखाच गेली काही वर्षे वागत आहे. भारतीय संघ ज्या कोणा परदेशी संघाविरुद्ध खेळतो त्याचे वकिलपत्र मांजरेकर घेतो आणी जे खेळाडू त्याच्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत, त्यांनाच तो नावे ठेवतो. असो विषय लॅंगरचा सुरु आहे त्यामुळे विषयांतर नको. मेलबर्न कसोटी भारतीय संघाने जिंकल्यावर खरेतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भेदरून गेले आहेत. माइंड गेम केल्यावर भारतीय संघाचे मनोधैर्य खच्ची होईल आणि आपण जिंकू या भ्रमात ते आजही वावरतात याचे आश्चर्य वाटते. भारतीय खेळाडूंनी असा काय टवाळपणा केला की लॅंगरने टीका करताना पातळी सोडून विधाने केली.
ज्या संघातील स्टिव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर हे दोन खेळाडू चेंडू कुरतडल्याप्रकरणी बंदी भोगुन आले आहेत. त्यांचा मिशेल मार्श व पॅट कमिन्सला या मालिकेत तीन वेळा पंचांनी वर्तनाबाबत तंबी दिली आहे. फलंदाजांना डीवचण्याचे उद्योग त्यांचा कर्णधार टीम पेनी, नाथन लियॉन व मार्नस लेबूशेन यांनीही केले असून त्यांच्यावर पहिल्या कसोटी सामन्यानंतर खुद्द ऑस्ट्रेलियन मीडियानेही टीका केली होती. म्हणजे हे सगळे पापभिरू आणि भारतीय खेळाडू टवाळखोर काय.
मेलबर्न कसोटी जिंकून भारताने यजमानांना धक्का देत मालिका बरोबरीत आणलीच आहे आता लॅंगरसह सर्व ऑस्ट्रेलियन टवाळखोरांना धडा शिकवण्यासाठी सिडनी कसोटीही खिशात टाकवी म्हणजे त्यांचा नक्षा उतरेल. कारण प्रश्न ज्या भाषेत विचारला जातो, उत्तरही त्याच भाषेत दिले गेले पाहिजे.