नवी दिल्ली – मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) सलग दुसऱ्यांदा केंद्राची सत्ता आली.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अरविंद सावंत (शिवसेना), हरसिम्रत कौर बादल (एसएडी), पासवान आणि आठवले (रिपाइं-आठवले गट) या एनडीएतील भाजपेतर घटक पक्षांच्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकमेव ठरण्याचा अनोखा मान मिळवला आहे. लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात आता भाजपेतर पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे आठवले हे एकमेव मंत्री ठरले आहेत.
काही महिन्यांपूर्वी शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. तर अलिकडेच नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवत शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) एनडीएपासून फारकत घेतली. साहजिकच, सावंत आणि बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदांचा राजीनामा दिला.
एनडीएत बिहारमधील सत्तारूढ जेडीयू या महत्वाच्या घटक पक्षाचा समावेश आहे. मात्र, वाट्याला पुरेशी मंत्रिपदे न आल्याने जेडीयूने केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व नाकारले.
मोदी यांच्यासह 30 मे 2019 या दिवशी 57 मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यामध्ये 24 कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असणारे 9 राज्यमंत्री आणि 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. सावंत, बादल यांचे राजीनामे आणि पासवान यांचे निधन यांमुळे आता केंद्रीय मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांची संख्या 21 पर्यंत खाली आली आहे.
काही दिवसांपूर्वी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाले. त्यामुळे राज्यमंत्र्यांची संख्या 23 इतकी झाली आहे. घटनेच्या निकषांनुसार केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यसंख्या 80 इतकी ठेवली जाऊ शकते.