दोन दशकांपूर्वी विश्रांतवाडीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेची सुविधा नव्हती. त्यामुळे मुलांना भरमसाठ फी भरून पुण्यातल्या शाळांमध्ये शिक्षण घ्यावे लागत होते. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांना ही फी भरता येणे शक्य नसल्यामुळे बहुसंख्य मुले शिक्षणापासून वंचित राहत असत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन व पालकांच्या मागणीवरुन विश्रांतवाडी-मोहनवाडी येथे वर्ष 1999 मध्ये लक्ष्मणराव देवकर यांच्या इंद्रायणी शिक्षण संस्थेने एस. एस. इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केली. या संस्थेच्या वाटचालीचा आढावा…
विश्रांतवाडी, कळस, प्रतिकनगर, मोहनवाडी भागातील मुलांना इंग्रजी माध्यमातील शिक्षण देण्याच्या उदात्त हेतूने नर्सरीच्या वर्गापासून शाळेची सुरुवात करण्यात आली. कालांतराने विद्यार्थी संख्या वाढत गेल्याने इयत्ता दहावीपर्यंत वर्ग वाढविण्यात आले. आता एकूण 1150 विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत. माफक फीमध्ये दर्जेदार शिक्षण देत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास श्री. लक्ष्मणराव देवकर यांनी घेतला आहे. त्यामुळेच आयएसओ 9001 मानांकन मिळविता आले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची पूर्तता करण्याकडे इंद्रायणी शिक्षण संस्थेने सतत वाटचाल सुरु ठेवली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जपणूक करण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करुन विविध क्षेत्रांमध्ये गगनभरारी घेऊन संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच मानसिक, बौद्धिक व शारीरिक वाढ करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. पुस्तकी ज्ञानाबरोबरच संस्कार, व्यायाम, योगा यांचे शिक्षण देण्याकडे अधिक लक्ष देण्यात येत असते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची वेळोवेळी दंत तपासणी करण्यात येते. शिक्षणाबरोबर विविध खेळांसाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यात येते. स्पीडबॉल, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, स्केटींग, कराटे या खेळांचे विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी दाखविली आहे.
विद्यार्थ्यांनी स्पीडबॉल या खेळात राष्ट्रीय स्तरावर मजल मारत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पारंपारिक असलेल्या व सध्या लोप पावत चाललेल्या आट्यापाट्या खेळात देखील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवित यश संपादन केले आहे.
आजच्या विज्ञान युगात जागतिक, सामाजिक नवरचनेत शिक्षणाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. हे विश्वची माझे घर ही कवी कल्पना आज साकार होत आहे. स्पर्धेच्या या गोंडस विश्वात आपली मुले ठामपणे उभी राहिली पाहिजेत. शैक्षणिक उच्चता, सर्वसाधारण सामाजिक जाणीवेबरोबरच आपल्या पाल्यांचा मानसिक विकास, विश्वास, आत्मविश्वास होणे हीच तर काळाची गरज आहे. संगणक क्षेत्रात, स्पोर्टसह इतर विविध क्षेत्रात मुलांचा विकास झाला पाहिजे हिच तळमळ आमच्या संस्थेची, शाळेची, शिक्षकांची आहे.
– लक्ष्मणराव देवकर,
संस्थापक अध्यक्ष, इंद्रायणी शिक्षण संस्था.
योगा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेत वाढ झाली असून गुणवत्ता वाढली आहे. तसेच वर्गातील विद्यार्थ्यांच्या उत्साहातही सकारात्मक बदल होत आहे. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना संधी देण्यासाठी विज्ञान, कलाकौशल्याच्या प्रदर्शनासह स्नेहसंमेलन, क्रीडा महोत्सव थाटात साजरे करण्यात येतात. सर्वच वर्गांसाठी शैक्षणिक सहली काढल्या जातात. शिष्यवृत्ती, एनटीसी भुगोल प्रज्ञा परीक्षा, ऑलिंपियाड, हिंदी राष्ट्रभाषा यांसारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण करण्यात होत आहे.
मुख्याध्यापिका नंदिता भादुरी यांच्यासह सर्वच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी धडपड करत आहेत. या शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. एनडीएमध्ये 3, एमबीबीएसमध्ये 2, बीडीएसमध्ये 6 विद्यार्थी कार्यरत आहेत. रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत शाळेतील 967 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर मनिष परिहार या विद्यार्थ्याने नॅशनल गोल्डन फर्स्ट ऍवॉर्ड प्राप्त केले.
राज्यातील दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी आवश्यक ती मदत सतत करण्यात येत असते. “नाम’ फाऊंडेशनला देखील मदत करण्यात आली. अनाथ आश्रम, व्यसनमुक्ती केंद्रात मिठाई वाटप करण्यात येते.
संगणक युगात सध्या विभक्त कुटुंब पध्दती निर्माण झालेली दिसते. त्यामुळे आजी आजोबांसोबत असणाऱ्या नात्याची वीण घट्ट करण्यासाठी शाळा आजी-आजोबा कृतज्ञता दिवस साजरा करते. तसेच विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांकडून विषयानुरुप मार्गदर्शन करण्यात येते. करिअरबाबतही मार्गदर्शन केले जाते. वेळोवेळी पालकांच्या सभा घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविल्या जातात.
(शब्दांकन : डॉ. राजू गुरव/प्रकाश बिराजदार)
शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून…
एखाद्या कुटुंबात दोन मुलीनंतर तिसऱ्या मुलीचा जन्म झाला असल्यास त्या मुलीलाही नर्सरी ते युकेजीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येते. गरीब व गरजू विद्यार्थी अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठीच या मोफत शिक्षणाच्या विविध योजना राबविण्यावर भर दिला जातो. तसेच संरक्षण दलातील नागरिकांच्या मुलांना नर्सरी ते युकेजीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते.
अक्षय देवकरची उत्तुंग भरारी
एस. एस. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी अक्षय लक्ष्मण देवकर याने ऑस्ट्रेलियातील सिडनी युनिवर्सिटीमधून मास्टर इन आर्किटेक्चर डिग्री मिळविली आहे. त्याविषयी बोलताना अक्षय देवकर म्हणाला की, लहानपणापासून ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा आई-वडील, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडून सतत मिळाली. यामुळेच आयुष्यात यशाचा महत्वाचा टप्पा गाठता आला आहे.आवड असल्यामुळेच करिअरसाठी आर्किटेक्चरचे क्षेत्र निवडले आहे.