ग्रामीण समाजव्यवस्थेचं जसं झपाट्यानं शहरीकरण, आधुनिकीकरण होत आहे, तसंच खेड्यांचं उजाडपण आणि एकाकीपण हाही जागतिकीकरणाचा एक अटळ परिणाम आहे. महामार्गावर किंवा वाहतुकीच्या आणि दळणवळणाच्या मार्गावर जी खेडी आहेत, त्यांच्यापर्यंत आता बऱ्याचशा सोयीसुविधा येऊन पोचल्या आहेत. पण वर्दळीपासून दूर असलेल्या आडवाटेवरच्या गावांचं काय? पाण्याची पातळी खाली खाली जाऊ लागल्यानं पूर्वी समृद्ध असलेल्या गावांची अवस्था आता दयनीय होऊ लागली आहे. विदर्भातल्या अशाच एका शेतीवर अवलंबून असलेल्या गावाची कहाणी “पांढर’ या रवींद्र शोभणेंच्या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळते.
साहेबराव पाटील हे गावचे पाटील. राखीव जागेमुळं यंदा मागास जातीतला गौतम सरपंच झालेला. मात्र साहेबराव पाटलांना अजूनही गाव मानतो. पण दुष्काळ पडला. पेरलेला गहू निकस निघाला. पाटील तोट्यात गेले. दिसायलाच मोठी शेती. सारा आतबट्ट्याचा व्यवहार झाला होता. गावातल्याच नव्हे तर आजूबाजूच्या पट्टयातल्या गावांचीही अशीच अवस्था होती.
जिथं पाण्याचं कधीही दुर्भिक्ष नव्हतं, तिथं पाण्याचा टॅंकर हा गावकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला. नुसत्या टॅंकरनं पाणी येण्यालासुद्धा केवढे पैलू असतात ते लेखकानं बारकाईनं दाखवलेत. गावात अडचणींना तोटा नाही. लोड शेडिंगमुळं दिवसदिवस वीज नाही. मोटर बंद असताना हजारोंचं वीजबिल येतं. ऑफिसात गेलं तर “पहिले बिल भरा’ हा त्यांचा खाक्या. सावकाराकडे गहाण ठेवलेली जमीन मोठ्या आशेनं सोडवून घ्यायला जावं, तर मुदत संपली म्हणून जमीन त्यानं घशात घातलेली. मातब्बर सावकाराविरुद्ध पोलिसात तक्रारही घेत नाहीत. आत्महत्या करतो तर त्याचीही दखल कुणी घेत नाही.
यातला साहेबराव पाटील मनात घर करून राहतो. कादंबरीत अनेक पात्रं आहेत. त्यांची कुटुंबं आहेत. ते सगळेजण आपापल्या परीनं जीवनाशी लढा देत आहेत. इथं दारिद्य्र आहे पण लाचारी नाही. टंचाई आहे पण तरीही माणुसकी आहे. सगळीकडून प्रतिकूल परिस्थिती घेरत असतानादेखील माणसं अखेरपर्यंत दैवाशी दोन हात करीत राहतात. पण दुष्काळामुळं अखेर हे गाव उठतं… ओसाड होतं.
मोठ्यांची शेती पिकली नाही तर मजुरीवर जगणाऱ्यांचे हाल. हातांना काम नाही. शिकूनही काही उपयोग नाही. तरुण पोरं धंद्यापाण्यासाठी शहरात जाऊन स्थिरावू लागली. दुष्काळी भागात मुली नांदायला येणं कठीण होतं. ज्या गावात पोट जाळण्यासाठी काम मिळत नाही, त्या गावात राहायचं तरी कसं? गाव ओसाड पडू लागलं. गाव सोडून जाणारे भाडेखर्चाचे पैसे वाचवून चालत निघतात. एकदा ते खूप लांब शेतकरी संघटनेच्या सभेलाही जातात. तिथं त्यांच्या मागण्या देतात. बरोबर आणलेला भाकरतुकडा खाऊन परत येतात.
पण त्यामुळं प्रश्न सुटत नाहीत. सरकारी उपाययोजनांचं कासव आपल्या गतीनं चालत राहतं. खरा प्रश्न अस्पर्शितच राहतो आणि तो म्हणजे जमिनीच्या पोटातून पाणी वर काढण्याचा. जमिनीतलंच पाणी आटायला लागलं तर शेतकऱ्यानं जगावं कसं? गावखेड्याविषयी आत्मीयता असलेल्या प्रत्येकाला ही कादंबरी आवडेल. यात भरपूर पात्रं आपापल्या मगदुराप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे आयुष्याची वाटचाल करीत आहेत. ही कुणा एकाचीच गोष्ट नाही. ही गावकऱ्यांची, आख्ख्या गावाची… पांढरसारख्या अनेक गावांची कथा आहे आणि म्हणूनच ती आपलीशी वाटते.
– माधुरी तळवलकर