आपण ज्या गावात जन्मलो त्या गावासाठी काही तरी भव्यदिव्य करावे गावाचा विकास झाला तर राज्याचा अन् देशाचा विकास होईल. गावाचा विकास करून गाव स्वयंपूर्ण बनवणे. गावात विकास योजना राबवून या विकासाच्या योजना सर्वसामान्य पोहोचवून लोकांचे जीवनमान उंचवणे आणि आपले गाव हेच आपले कुटुंब समजून एक विकास कामांचा धडाका लावला आहे, तो काठापूर खुर्द (ता.शिरूर) येथील थेट जनतेतून निवडून आलेले तरुण सरपंच बिपीन सुदामराव थिटे यांनी. या तरुण सरपंचाने समाजसेवेचा एक आदर्श तरुणांपुढे ठेवला आहे.
एका गरीब शेतकरी कुटुंबात बिपीन थिटे यांचा जन्म झाला. घरातील कुटुंबाला हातभार लावला म्हणून इयत्ता 9 वीमधून शिक्षण सोडावे लागले आणि शेती व्यवसायाकडे वळावे लागले. शेतात कांदा, बटाटे, ऊस, तरकारी पिके घेऊन आर्थिक प्रगती होत असताना शेतीला जोडधंदा म्हणून ट्रॅक्टर आणि जेसीबी विकत घेतले आणि व्यवसाय सुरू केला.
सामाजिक कामाचे बाळकडू घरातूनच थिटे यांना मिळाले. गावात सामाजिक आणि धार्मिक कामे करीत असताना तरुणांच्या व ज्येष्ठांच्या आशीर्वादाने गावच्या ग्रापंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत उभे राहून थेट जनतेतून सरपंचपदी विक्रमी मतांनी निवडून आले आणि तरुण सरपंचपदी होण्याचा मान मिळाला. गावाचा कारभार हाती घेताच शाळेची इमारत, अंगणवाडी दुरुस्ती, ग्रामपंचायत दुरुस्ती, दलित वस्ती कॉंक्रिटीकरण, काठापूर ते दाते मळा रस्ता डांबरीकरण, स्मशानभूमी सुशोभीकरण, लोकवर्गणीतून हनुमान व विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडप, पथदिवे अशी एक कोटी रुपयांची कामे करण्यात आली.
मुख्यमंत्री सडक योजनेतून काठापूर ते थिटे मळा रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 29 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. ही सर्व कामे ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे मार्गदर्शन, सहकार्याने करण्यात आली. गावाच्या विकास कामाला उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई गावडे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. गावाच्या विकास कामाचा ध्यास घेणारे म्हणून सरपंच बिपीन थिटे यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.
भविष्यातील कामे भविष्यात दातेमळा ते भागडी, दिघेमळा, औटी मळा रस्ता तसेच हनुमान मंदिर, मुक्तादेवी मंदिर बांधकाम, गावाला शुद्ध पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत परिसर कॉंक्रिटीकरण, पथदिवे आणि गायरान जमिनीत फळबाग लागवड करण्यात येणार आहे.