अनेक गावांत समस्या गंभीर : ग्रामपंचायती अपयशी
सोरतापवाडी- हवेली तालुक्यातील मांजरी, शेवाळेवाडी, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, नायगाव, उरूळी काचंन, आळंदी म्हातोबाची, आदी गावातील ग्रामपंचायतीला मोठ्या कचरा प्रकल्प करणाऱ्या उद्योगपतींची गरज आहे. यासाठी राजकीय मानसिकतेचा विकासच खुंटलेला आहे. त्यामुळे अनेक गावे या समस्यांनी व्यापून गेली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी कचरा वेळोवेळी उचलला जात नसल्याने ग्रामपंचायती अपयशी ठरत असल्याचे विदारक चित्र उभे ठाकले आहे.
मांजरी हद्दीत सोलापूर महामार्गावर मांजरी बाजाराच्या अलीकडे कित्येक दिवस कचरा उचलला जात नाही. महामार्गावर सर्वत्र कचराच कचरा दिसत आहे. परिसरातील नागरिक कचरा टाकून देत आहेत. तेथे दोन कचरा कुंड्या असून शिस्तीला तिलांजली देत आहेत. राजश्री शाहू महाराज बॅंकेसमोर व मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राजवळील ओढ्याजवळ कचरा साठलेला आहे.
द्राक्षबागेजवळ सुद्धा कचरा टाकला जात आहे. त्यामुळे कचऱ्यातून महामार्ग शोधावा लागत आहे. इतकी विदारक परिस्थिती महामार्गाची झाली आहे. कदमवाकवस्ती हद्दीत कचऱ्याची तीव्रता जादा आहे. कदमवाकवस्ती हद्दीतील पालखी तळाच्या दोन्हीही रस्त्यावर व पालखी तळात कचरा टाकला जात आहे. पालखीतळ का कचरातळ हेच कळत नाही. लोणी स्टेशन परिसरात हीच परिस्थिती आहे. लोणी व कदमवाकस्ती हद्दीतील ओढ्याशेजारी नागरिक बिनधास्त कचरा टाकत आहेत. कुंजीरवाडी येथील कचरा आळंदी रस्त्याच्याकडेला असलेल्या शाळेच्या शेजारी भिंतीच्या कडेला टाकला जात आहे. नायगाव येथील कचरा गायरानात टाकत आहेत.
सोरतापवाडी येथील कचऱ्याचे योग्य नियोजन सरपंच सुदर्शन चौधरी हे करीत आहे. हा पूर्व हवेली तालुक्यातील या गावचा अपवाद आहे. चौधरी यांनी कचरा टाकण्यासाठी स्वत:ची एक एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. ऊरूळी कांचन येथील कचरा गोळीबार मैदानात टाकला जात आहे. काही ग्रामपंचायती सोडल्या तर पूर्व हवेलीतील ग्रामपंचायती कचरा प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरल्या आहेत. नागरिक कचऱ्याने हैराण होत आहे. पूर्व हवेलीसाठी एक मोठा कचरा प्रकल्प सरकारने केला पाहिजे. नागरिकांचे म्हणणे बरोबर असून परिसरात कचरा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सरकारी मालकीची हजारो एकर जमीन आहे. मात्र, एक मोठा कचरा प्रकल्प होत नाही. हे नागरिकांचे दुर्देव आहे.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील कचरा उचलून तो नदीच्या शेजारी असलेल्या सरकारी जागेत टाकला जात होता. पण तो रस्ता एमआयटीने अडवल्याचे निवेदन तहसीलदार सुनील कोळी यांना दिले आहे. एमआयटीचे संचालक मंगेश कराड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कुठलाही रस्ता अडवला नसल्याचे सांगितले. त्या सरकारी जागेत एक मोठा कचरा प्रकल्प होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी बोलून दाखविले. सोलापूर महामार्गावरील गावांचा कचरा एकत्र करून त्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून त्यावर वीज निर्मिती होईल किंवा शेतीला खत सुध्दा मिळेल. या प्रकल्पासाठी राजकीय मानसिकता कमी पडत असल्याचे हे द्योतक आहे.