नवी दिल्ली – “आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दहा दिवस होऊन गेले आहेत. मात्र या चित्रपटातील संवाद आणि पोशाखांवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटातील काही संवाद बदलण्यातही आले आहेत. मात्र, हा वाद न्यायालयात पोहोचला असून न्यायालयानेही सुनावणी वेळी ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांना फटकारले आहे.
या प्रकरणी न्या. राजेश सिंह चौहान आणि न्या. श्रीप्रकाश सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. वरिष्ठ वकील रंजना अग्निहोत्री यांनी बाजू मांडत चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद आणि चुकीचे प्रसंग याबाबत न्यायालयाला माहिती दिली. या चित्रपटाविरोधात वकील कुलदीप तिवारी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यात प्रेक्षकांचे हे म्हणणे आहे की रामायणासारख्या धर्मग्रंथाचा हा अपमान असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सुनावणीवेळी न्यायालयाने वकील अश्विनी सिंह यांना विचारले की सेन्सॉर बोर्ड काय करत आहे? चित्रपट हा समाजाचा आरसा आहे, असे म्हटले जाते. येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही काय शिकवणार आहात? सेन्सॉर बोर्डाला त्यांची जबाबदारी समजत नाही का? तसेच रामायण, कुराण, गुरु ग्रंथसाहेब, भगवतगीता यांसारख्या धार्मिक ग्रंथाना तरी सोडा, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले.
तसेच चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अन्य प्रतिवादी हे न्यायालयात उपस्थित का नाहीत? असाही प्रश्न उपस्थित केला. रंजना अग्निहोत्रींनी कोर्टाला हे देखील सांगितले की अद्याप याविषयीचे उत्तर सेन्सॉर बोर्डानेही दिलेले नाही. तसेच चित्रपटात रावण वटवाघुळाला मांस खाऊ घालताना दाखवला आहे, सीतेला स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये दाखवले गेले आहे. वटवाघुळ म्हणजेच रावणाचे विमान दाखवले आहे, काळ्या रंगाची लंका, सुषेण वैद्याचा उल्लेख न करणे, बिभीषणाच्या पत्नीने लक्ष्मणाला संजीवनी देणे अशा आक्षेपार्ह प्रसंगांवरही आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी आता 27 जून रोजी निश्चित करण्यात आली आहे. मनोज मुंतशीर यांना वादी करायचे की नाही यावरही सुनावणी होणार आहे.