रत्नागिरी – दापोली तालुक्यातील आसूद जोशी बागेजवळ रविवारी झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 8 वर पोहोचला आहे. या अपघातात बापलेकीचाही समावेश आहे. तर सात जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम साहित्य रिकामे करुन ट्रेलर दापोलीच्या दिशेने जात होता, तर वडाप 14 प्रवाशांना घेऊन हर्णेच्या दिशेने जात होती. दोन्ही गाड्या जोशी बागेजवळील अवघड वळणावर आल्या.
यावेळी ट्रेलरने बाहेरुन वळण घेतल्यामुळे वडापला पुढे जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. याचवेळी ट्रेलरने या गाडीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, दापोली येथे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडूनही त्यांनी याविषयी माहिती घेतली व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देशही दिले आहेत. तसेच जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.