राजेंद्र वारघडे
पाबळ – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात अनेक दिग्गज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटासाठी उत्सुक असले तरी काही जण “सत्ताधारी पक्षाच्या वशीकरण’ प्रयोगात अडकण्याची ठाम शक्यता असल्याने व पक्षनेतृत्त्वही “उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’, या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. पक्षाशी निष्ठावान, पक्षनेतृत्वावर विश्वास व जनाधार असलेल्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे, या रेसमध्ये माजी आमदार व घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. अशोकबापू पवार प्रथम पसंतीस उतरतील अशी जनमानसांत व राजकीय धुरीणांमध्ये चर्चा आहे.
शिरूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचे असले तरी मूळचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला ढासळण्यामागे, राष्ट्वादीतील कार्यकर्त्यांचीच करामत असल्याची माहिती सर्वश्रुत आहे, यावेळी मात्र या करामतखोरांची गोची होण्याची अथवा त्यांना पक्ष सोडण्याची वेळ येणार असल्याने त्यांची पंचाईत होण्याची दाट शक्यता आहे. कारण यांचा मोठा जनाधार असलेला एक मोठा नेता यावेळी पराभूत झाल्याने अशांना थारा मिळण्याची शक्यता किमान राष्ट्रवादीत मावळली असल्याची बाब पुढे येत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा मतदासंघांतील शिरूर व आंबेगाव हे तालुके विकासात पुढे मानले जातात. राष्ट्रवादीच्या माध्यमातून पाण्याखाली आलेला मोठा भाग, साखर कारखाने, एमआयडीसी, रस्ते व आरोग्य या मुख्य विकासप्रक्रियेतील पाया भरणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून मोठी आहे. सत्ताधारी भाजपचे आमदार असूनही गत पाच वर्षातील ठळक कामाची जंत्री दिसत नसल्याने या भागात भाजपला पाय रोवणे ही बाब अशक्यप्राय ठरण्याची दाट शक्यता आहे. तर पक्षनिष्ठा, पक्षनेतृत्वावर ठाम विश्वास, जनमानसांत चारित्र्य संपन्न म्हणून प्रतिमा, विकास कामाविषयी जागरूकता व सर्वसामान्यांत मिसळणारा कार्यकर्ता अशी प्रतिमा या जमेच्या बाजूंमध्ये माजी आमदार अशोक पवार यांचा वरचा क्रमांक आहे.
शिरूर-हवेलीत राष्ट्रवादीला पूरक वातावरण
दुसऱ्या बाजूला न भूतो न भविष्यती अशी सर्वच पक्षातून सत्ताधारी पक्षात भरती सुरू आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापुढे आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत बंडखोरांची मिनतवारी होण्याची शक्यता नसल्याने, अशा द्विधा मनस्थितीतल्या इच्छुकांना पक्ष सोडणे अथवा पक्षाशी निष्ठा व्यक्त करणे हे दोनच पर्याय उरले आहेत. यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला शिरूरची उमेदवारी निश्चित करण्यासाठी कसरत करावी लागणार नसल्याचे मत व्यक्त होत आहे. हीच बाब राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला विजयाकडे नेण्याची दाट शक्यता आहे.
नव्यांना अधिक संधी
राजकारणात काहीही घडू शकते, या उक्तीप्रमाणे सत्ताधारी पक्षात गर्दी होत आहे तर विरोधी पक्षात दुसरी फळी उदयाला येत आहे. पण कोणाला निवडून द्यायचे त्याचा निर्णय घेणारी जनता हे सर्व खेळ पाहत आहे, अशा परिस्थितीत फंदफितुरीने ग्रासलेले पक्ष मोकळा श्वास घेत आहेत. त्यामुळेच नव्या दमाची पिढी पुढे येत आहे, अशांना भक्कम मार्गदर्शन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शांतपणे देऊ शकतात, जनतेने नव्याना संधी देण्याचे ठरवले तर काहीही घडू शकते, याचेच ताजे उदाहरण डॉ. अमोल कोल्हे यांचे माध्यमातून पुढे आहे, यामुळे राजकारणात किमान विधानसभेत काहीही घडू शकते, हे वास्तवही येत्या चार महिन्यांनी पहावयास मिळणार आहे.
अजितदादांच्या सावलीतील बंडखोरांची गोची
लोकसभेतील अट्टहासामुळे मावळात झालेला पराभव व वशिकरणातून जात असलेले नेते यामुळे विधानसभेच्या उमेदवार निवड प्रक्रियेत शरद पवार यांचाच अंतिम निर्णय असण्याची दाट शक्यता आहे. यामुळे अजितदादांच्या सावलीतील बंडखोरांची गोची होणार असल्याने, अशोक पवारांच्या समस्या आपोआप कमी होणार असल्याचे चित्र पुढे येत आहे.