अतिवृष्टीमुळे कोसळल्या दरडी : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
भोर – तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या महाड-भोर-पंढरपूर राज्य महामार्गावरील वरंधा घाट रस्त्याची दुर्दशा झाली आहे. घाटात कोसळलेल्या दरडी आणि काही ठिकाणी रस्ता खचल्याने घाटरस्ता वाहतुकीस गेल्या महिन्यापासून बंद आहे. या मार्गावरील उंबार्डे, शिरगाव, वारवंड, हिर्डोशी, कोंढरी वेणुपुरी, देवघरते निगडघरपासून आपटीपर्यंतच्या हिर्डोशी खोऱ्यातील नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे.
भोर आगारातून या मार्गावरुन जाणाऱ्या एस.टी. बंद करण्यात आल्याने शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थांना प्रामुख्याने याचा फटका बसला आहे. पुण्याकडून महाड रायगडकडे जाणाऱ्या आणि भोर आगाराच्या बसेस बंद झाल्याने याचा मोठा फटका राज्य परिवहन मंडळास बसला आहे. महामंडळाचे रोज 35 ते 40 हजारांचे नुकसान होत असल्याचे भोर आगाराच्या सूत्रांनी सांगितले.
भोर-महाड हा वरंधघाट रस्ता वर्दळीचा असून पावसाळ्यात धबधब्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची कायम गर्दी असते. मात्र, सध्या या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. या मार्गावरील छोटी-मोठी हॉटेल बंद झाली आहेत. दोनच दिवसांपूर्वी या मार्गावरील शिळींबपर्यंत एस.टी.बस सेवा सुरू करण्यात आली असली तरी वाहन चालकास खड्डे चुकवतच बस चालवावी लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी लवकरात लवकर मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे.
भोर-महाड या घाट मार्गासाठी नुकताच 9 कोटी 72 लाखांचा निधी आमदार संग्राम थोपटे यांनी मंजूर करुन घेतला होता. या रस्ताचे कामही ठेकेदाराने सुरू केले होते. मात्र, अतिवृष्ठीत रस्त्यांची पुरती वाट लागली असून आनेक ठिकाणी रस्ताच वाहून गेला आहे. कोंढरी गावच्या हद्दीत रस्त्यावर दरड कोसळून राडारोडा पडला आहे. रस्त्यावरील राडारोडा हटविण्याची तसदी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नाही. त्यामुळे हिर्डोशी येथील समर्थ रामदास स्वामी विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी राडारोडा हटवत असल्याचे शिक्षक एस. आर. डांगे यांनी सांगितले.
भाजीपाला नेण्यास अडचण
गेल्या महिनाभरापासून वरंधा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने महाडकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. त्यांना महाबळेश्वर किंवा कसेळी या लांब पल्याच्या वापर करावा लागत असल्याने खर्चही वाढत आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. पुरंदर, सासवड, पुणे, भोरहुन महाड रायगडकडे जाण्यासाठी वरंधा घाट मार्ग हा जवळचा असून शासनाने या मार्गावरील खड्डे बुजवावेत व वरंधा घाटात कोसळलेल्या दरडी लवकरात लवकर हटविण्याची मागणी व्यापारी व शेतकऱ्यांनी केली आहे.