पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले मत
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी या माध्यमातून नवा भारत विषयावर आपलं मत मांडले. यावेळी त्यांनी आजचा हा नवा भारत आहे, येथे तरुणांच्या आडनावाला महत्त्व नाही. तर आपले नाव सिद्ध करण्याच्या क्षमतेला महत्त्व आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
देशात दिसणारा हा नवा भारत आहे जिथे तरुणांचे आडनाव काय आहे यामुळे फरक पडत नाही. तर आपले नाव सिद्द करण्याच्या क्षमतेला महत्त्व आहे. काही मोजक्या लोकांचा नाही तर प्रत्येक नागरिकाचा आवाज ही नव्या भारताची ओळख आहे. नव्या भारतात भ्रष्टाचाराला स्थान नाही, मग ती व्यक्ती कोणीही असो, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. तसेच याचविषयावर पुढे बोलताना नरेंद्र मोदी यांनी बहुभाषिक असणारा भारत जगातील एकमेव देश असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेतले. भाषेचा फायदा घेत अनेकांनी भारतात स्वार्थापोटी विभागणी करत आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केल्याची, खंत नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केली. भाषेतही ताकद असून त्याचा वापर करत आपण सर्वांना एकत्र आणले पाहिजे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. यासाठी त्यांनी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घेत वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणे गरजेचे असल्याचे सांगितले.