रस्ते, पेठा चकाचक; रोजच्या कचऱ्यात 500 टनांनी घट
पुणे – लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार बंद असल्याने रोजच्या तुलनेत सुमारे 500 टन कचरा कमी झाला आहे. प्रामुख्याने रस्त्यावरील कचरा तसेच हॉटेल व्यवसाय बंद असल्याने कचऱ्याचे हे प्रमाण कमी झाल्याचे घनकचरा विभागाचे प्रमुख सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले.
पुणे शहरामध्ये 10 लाखांहून अधिक मिळकती आहेत. तेथे निर्माण होणारा तसेच सार्वजनिक रस्त्यांच्या झाडण कामाचा, हॉटेल आणि व्यावसायिक आस्थापनांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच झाडांचा पाला पाचोळा, नारळाच्या झावळ्या, फांद्या या गार्डन वेस्टचाही यामध्ये समावेश आहे. करोना रोगाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर 15 मार्चनंतर शहरात प्रथम जमावबंदी आणि नंतर राज्य आणि केंद्र सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सेवा बंद ठेवण्यात आल्याने आणि नागरिकांना घराबाहेर पडण्यावर बंधने घालण्यात आल्याने कचरा निर्मिती कमी झाली आहे.
यामुळे इतरवेळी शहरातील रस्त्यांवर दिसणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही जवळपास शून्यावर आले आहे. प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर ओल्या कचऱ्याची निर्मिती जेथे होते तो हॉटेल व्यवसायही बंद ठेवण्यात आला आहे. याठिकाणी दररोज 200 मे.टन ओला कचरा गोळा होतो. घरांमध्ये निर्माण होणारा सुमारे 80 टन कचरा हा सोसायट्यांच्या आवारातील गांडूळ खत प्रकल्पांमध्ये जिरवण्यात येतो.
कचरा वेचकांच्या माध्यमातून सुमारे 75 टक्के घरातून ओला आणि सुका कचरा गोळा केला जातो. कचरा वेचकांकडून सुक्या कचऱ्यातून प्लॅस्टिक आणि अन्य पुनर्वापरात येणाऱ्या वस्तूंचे वर्गीकरण केले जाते. तर झाडांचा पालापाचोळ्यापासून निर्माण होणारे गार्डन वेस्ट स्वतंत्ररित्या गोळा करण्यात येते.