लोणंद – सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दहा ते बारा दिवसात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणाचे 9 दरवाजा उचलून 99 हजार 475 क्युसेक पाणी नीरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती वीर धरण अभियंता विजय नलवडे यांनी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग निरा नदीपात्रात करण्यात आल्यामुळे निरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधे नीरा खोऱ्यात असलेली भाटघर, नीरा देवधर, गुंजवणी ही सर्व धरणे गेल्या दहा ते बारा दिवस पडत असलेल्या दमदार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. वीर धरणात होत असलेल्या पाण्याची आवक वाढल्याने धरणातून शनिवारी दुपारी 5 वाजल्यापासून नऊ दरवाजे उचलून 41 हजार 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये करण्यात येत होता. सोमवारपासून धरणाचे 9 दरवाजे आणखी उचलुन 99 हजार 475 क्युसेक एवढा विसर्ग निरा नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.