मुंबई : शिवसेनेशी बंड करीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन आसाम गाठले आहे. शिंदे यांच्या बंडखोरीला एक आठवडा पूर्ण झाला आहे तरीदेखील अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. आता शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिंदे गटाने एक मोठा दावा केला आहे. 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आहे असा दावा याचिकेत केला आहे. तसेच राज्यपालांना आम्ही सरकराचा पाठिंबा काढत आहोत असे पत्र देखील राज्यपालांना पाठवलेले आहे.
काय आहे याचिकेत ?
काही वेळातच सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी सरकार अल्पमतात आल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. आमच्याकडे एकूण 51 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यात शिवसेनेचे 39 आमदार आहेत. कालपर्यंत हा आकडा 38 होता. उदय सामंत आल्याने तो 39 झाला आहे. दोन तृतियांशच्या आकड्यासाठी 36आमदार लागतात. त्यामुळे आमच्याकडे पुरेसा आकडा आहे, असा दावा शिंदे गटाने केला आहे.
राज्यपालांना पत्र
शिंदे गटाकडून राज्यपालांना पत्र पाठवण्यात आले आहे. ‘आम्ही सरकराचा 38 आमदारांनी पाठिंबा काढत आहोत असे पत्र देखील राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पाठवलेले आहे. ३८ आमदारांचा पाठिंबा काढत असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलेले आहे, शिवाय सरकारने बहुमत सिद्ध करावं असे देखील शिंदे गटाने राज्यपालांना पाठवलेल्या पात्रात म्हंटले आहे.