रेडा-रेडणी (ता. इंदापूर) येथील जुना पाझर तलाव पाण्याअभावी ठणठणीत कोरडा पडला आहे. त्यामुळे या भागातील नागरिक, जनावरांना पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने रेडणी येथील पाझर तलावात तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. रेडणी गावाला पाणी पुरवठा होणारी सार्वजनिक विहीर या गावच्या हद्दीत असणाऱ्या पाझर तलावांमध्ये आहे. येथील या तलावास मागील महिन्यापूर्वी मोठ्याप्रमाणात पाणी होते. परंतु उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याचा थेंब देखील या तलावात शिल्लक राहिलेला नाही.खरेतर पाण्यावाचून वंचित असणाऱ्या 22 गावांमध्ये रेडणी, रेडा ही गावे मोडतात, त्यामुळे या भागाला हक्काचे पाणी मिळतच नाही. या गावातील पशुधन जगवण्यासाठी मोठी मेहनत रात्रंदिवस शेतकरी व नागरिकांना करावी लागते. त्यातच शेतकऱ्यांना भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे.
शेतीसाठी दिवसा नाही तर रात्रीची वीज मिळत आहे. त्यामुळे इकडे आड अन् तिकडे विहीर अशी अवस्था येथील शेतकऱ्यांची झाली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गाय, म्हशीचे संगोपन शेतकरी करतात. शेतीमध्ये पाणी नसल्यामुळे शेतामध्ये पिके घेऊ शकत नाहीत, त्यामुळे जोडव्यवसाय म्हणून गाय, म्हशीचे संगोपन केले जाते. तसेच उन्हाळ्यात जनावरे, पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे नागरिक, शेतकऱ्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सद्या या तलावातील पाणी आटल्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- नागरिक, जनावरांची होतेय हेळसांड-
या भागातील नागरिक पाण्यासाठी तलावावर अवलंबून आहेत. या तलावातील पाणी वाढत्या उन्हामुळे तळाला गेले आहे. त्यामुळे नाकरिकांना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. यामुळे पाटबंधारे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तलावात पाणी सोडावे, अशी मागणी नागरिक, शेतकरी वर्गातून होत आहे. या तलावात प्रशासनाने पाणी सोडल्यास जनावरे, नागरिकांची होणारी हेळसांड थांबेल. - पाटबंधारे विभागाचे उन्हाळी सुटणारे शेतीसाठी आवर्तन कॅनॉलद्वारे सुटले जाते. या पाटबंधारे विभागाचे पाणी रेडणी येथील तलावात सोडले जावे. तरच येथील जनावरे व नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
-माऊली हाके, सामाजिक कार्यकर्ते.