जागा वाटपाकडे इच्छुकांच्या नजरा
आचारसंहितेनंतरच चित्र होणार स्पष्ट
सातारा लोकसभेमुळे घेतलाय धसका
सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यानंतर पुरुषोत्तम जाधव यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, ऐनवेळी जाधव यांच्या ऐवजी भाजपचे नरेंद्र पाटील यांना शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवारी घोषित करण्यात आली. सर्व घटनाक्रम जाधव यांच्यासाठी धक्कादायक होता. पार्श्वभूमीवर आगामी विधानसभासाठी युती होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, जोपर्यंत जागा वाटपाचा निर्णय होत नाही आणि उमेदवारीचा एबी फॉर्म हातात मिळेपर्यंत पक्षप्रवेश रखडण्याची शक्यता अधिक आहे.
सातारा – लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती घट्ट राहणार आहे. आमच ठरलंय, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट संकेत दिले. तेव्हापासून सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर भाजपमध्ये होणारे संभाव्य प्रवेश ही रखडले आहेत.
पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा ठोस निर्णय झाल्यानंतरच पक्षप्रवेशाची गती वाढणार आहे. केंद्रात व राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने सरकारवरच्या कारभारावर टोकाची टीका केली होती. त्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीपूर्वी युती होण्याबाबत साशंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, अखेर भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत लोकसभेसाठी युती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेला देखील युती होणार असल्याचे जाहीर केले.
विधानसभेला मित्र पक्षांना जागा वगळून भाजप-सेनेला प्रत्येकी 50 टक्के जागा देण्याचा निर्णय देखील फडणवीस यांनी जाहीर केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उद्धव ठाकरे यांनी विधानसभेला युती घट्ट राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यात आमदार होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या इच्छूक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषत: कराड-उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपच्यावतीने मनोज घोरपडे मागील साडे चारवर्षांपासून तयारीला लागले आहेत. त्याचबरोबर त्यांनी मागील निवडणूक युतीत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढविली. मागील साडे चार वर्षात घोरपडे यांनी ना. चंद्रकांत पाटील व ना. शेखर चरेगावकर यांच्या मदतीने मतदारसंघ पूर्णत: पिंजून काढला आहे. अशा स्थितीत नुकतेचे शिवसेनेचे नेते नितीन बानूगडे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून कराड-उत्तर मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यामुळे त्या मतदारसंघाचा तिढा वाढला आहे.
वास्तविक भाजपने मागील साडे चार वर्षात शत प्रतिशत भाजप उद्देश समोर ठेवून सर्व आठ विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू केली होती. परंतु लोकसभा निवडणुकीतील युतीनंतर भाजपला ब्रेक बसला आहे. भाजपने पाटण वगळता सर्वच मतदारसंघात उमेदवार तयार ठेवले होते. त्यापैकी बऱ्याच इच्छूक उमेदवारांनी मागील निवडणूक लढवून आगामी निवडणूकीची तयारी पूर्ण केलेली आहे. अशात युती होणार आणि मित्रपक्षांसह भाजप-सेनेमध्ये जागा वाटप होणार आहे.
मित्रपक्षांमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष माण-खटाव विधानसभा मतदारसंघावर दावा करणार हे निश्चित आहे. त्यामुळे आजपर्यंत भाजपकडून तयारी करणारे अनिल देसाई व माजी आमदार दिलीप येळगावकर काय भूमिका घेणार? लोकसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला रामराम करून भाजपचे उमेदवार रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्यासाठी प्रचार करणारे शेखर गोरे हे देखील काय करणार? यासह अनेक प्रश्न माण-खटाव विधानसभा मतदारसंघात उपस्थित होणार आहेत. त्याचबरोबर फलटण विधानसभा मतदारसंघ भाजप की सेनेच्या वाट्याला जाणार? या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यानंतर दिगंबर आगवणे हे पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे.