रायगाव येथील सेवामार्गावरील वाहतूक विस्कळीत : अंदाज न आल्याने कार पाण्यात
प्रशासनाचेही नेहमीप्रमाणे दुर्लक्ष
दरवर्षी पावसाळ्यात हा भुयारी मार्ग पाण्यात जात असल्याने याठिकाणी उड्डाणपूल बांधावा अथवा याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. मात्र, संबंधितांकडून या मागणीकडे अद्यापपर्यंत गांभीर्याने घेतले नसल्याने नेहमीप्रमाणे रविवारच्या पावसात हा उड्डाणपूल पाण्याखाली गेला आहे.
सातारा – सहापदरीकरणानंतर प्रत्येक पावसात रायगाव, ता. जावली येथील महामार्ग ओलांडण्यासाठी बांधण्यात आलेला भुयारी मार्ग हा जलमय होत असतो. रविवारी झालेल्या पहिल्या मान्सूनपूर्व पावसातही हा भुयारी मार्ग जलमय झाला होता. दरम्यान, या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने एक चारचाकी कार पुरती पाण्यात बुडाली. पाऊस कमी झाल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ही कार काढण्यात आली.
महामार्गाचे सहापदरीकरण झाल्यानंतर गावठाण असणाऱ्या ठिकाणी कुठे उड्डाणपूल तर कुठे भुयारी मार्ग काढण्यात आले. यामुळे स्थानिकांना महामार्ग ओलांडणे सोपे आणि सुरक्षित झाले. त्याचप्रमाणे जावली तालुक्यातील रायगाव याठिकाणी महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. मात्र भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला तीव्र उतार असल्याने भुयारी मार्गाच्या निर्मितीनंतर आजपर्यंत प्रत्येक पावसात हा मार्ग जलमय झाला आहे. पावसामुळे संपूर्ण भुयारी मार्ग तुुडुंब भरत आहे.
रविवारी दुपारी आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने येथील भुयारी मार्ग नेहमीप्रमाणे तुडुंब झाला होता. याठिकाणी तब्बल दहा ते पंधरा फूट इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. दरम्यान, पाण्याचा आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने एक कार या पाण्यात फसली. पाऊस ओसरल्यानंतर ही कार क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली.