सिडनी – कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग दोन टी-20 सामन्यांसह ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका जिंकली असली तरीही आज होत असलेला अखेरचा सामना जिंकत निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठीही कोहली आणि कंपनी सज्ज आहे.
रविवारी झालेली दुसरी लढत हार्दिक पंड्याच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारताने 6 गडी राखून जिंकली व मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. दोन वर्षांपूर्वी कोहलीच्याच नेतृत्वाखालील संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करण्याचा विक्रम केला होता. त्याचीच पुनरावृत्ती करण्याची यंदाही संधी मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाबाबत बोलायचे झाले तर त्यांच्या संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने या मालिकेतून माघार घेतली होती. तर त्यात कर्णधार अरन फिंचची भर पडली. त्यातच वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कनेही कौटुंबिक कारणाने माघार घेतल्याने त्यांची गोलंदाजी देखील कमकुवत बनली आहे. स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ग्लेन मॅक्सवेल व मोझेस हेन्रीक्स याच चार फलंदाजांवर त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. आर्सी शॉर्ट व डॅनियल साम्स यांच्याकडे गुणवत्ता आहे. मात्र, अनुभवाची कमतरता असल्याने त्यांची कामगिरी त्यांच्यासाठी बोनस ठरेल. आयपीएल
स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणारा मार्कस स्टोनिस अपयशी ठरत असल्याने त्यांना संघात एका अष्टपैलूची उणीव भासत आहे. त्यातच त्यांचा ऍडम झम्पा वगळता एकही गोलंदाज आपली छाप पाडू शकलेला नाही. हेन्रीक्स जरी चांगला गोलंदाज असला तरीही भारतीय फलंदाजांवर वर्चस्व राखण्यात त्यालाही अपयश आले आहे.
त्यातच साम्स, सिन अबॉट व ऍण्ड्य्रू टाय यांच्यावरही त्यांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. अशा स्थितीत यजमान संघाला भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी चमत्कारच घडवावा लागेल.
भारतीय संघाचे सलग दोन विजयांमुळे मनोबल चांगलेच उंचावलेले आहे. आजच्या सामन्यात पराभूत झाल्यावरही मालिकेच्या निर्णयावर कोणताही परिणाम होणार नसल्याने कोहली आणि कंपनी अत्यंत सहजतेने या सामन्यात खेळ करेल. त्याच बरोबर संघात काही फेरबदल होण्याचीही शक्यता आहे.
कर्णधार कोहली या सामन्यात सलामीवीर शिखर धवन, यजुवेंद्र चहल व मयंक आग्रवाल यांना संधी देण्याचेही संकेत मिळत आहेत. आगामी कसोटी मालिका पाहता कोहली या सामन्यात तरी सेकंड बेंचला खेळवण्याबाबत अनुकुल आहे. भारताची फलंदाज कागदावर सरस असली तरीही धवन, कर्णधार कोहली, लोकेश राहुल यांना मोठी खेळी करण्यात यश आलेले नाही.
धवनने दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्याने आपली जबाबदारी ओळखून अखेरपर्यंत खेळपट्टीवर उभे राहणे गरजेचे होते. कोहली देखील या मालिकेत ज्या पद्धतीने बाद होत आहे ते पाहता खरी मदार पुन्हा एकदा पंड्यावरच राहणार आहे. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने संघाला डावखुरा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याच्यावरच फिरकीचा भार राहणार आहे.
तसेच अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमी व नवोदित नवदीप सैनी यांनाही संधी मिळू शकेल. सलग दोन सामने जिंकलेल्या भारतीय संघाला अखेरच्या सामन्यासह यजमान संघाला व्हाइटवॉश देण्याची संधी चालून आली आहे. त्यात संघ यशस्वी झाला तर कोहली परदेशात विजयी सातत्य राखणारा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरेल.
डेथ ओव्हर्समधील कामगिरी महत्त्वाची
भारतीय संघ या मालिकेतील सलग दोन सामने जिंकला असला तरीही काही प्रश्न अद्याप तसेच आहेत. पहिल्या सहा षटकांत तसेच 11 ते 15 षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी सरस कामगिरी केली आहे. मात्र, त्यांना अखेरच्या पाच षटकांत म्हणजेच डेथ ओव्हर्समध्ये आपले गोलंदाज धावांवर नियंत्रण राखण्यात अपयशी ठरले आहेत. या एकाच बाबतीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो त्यावरच संघाचे यशापयश अवलंबून राहणार आहे.