सांगली : सांगलीतील कोरोना रुग्णांची संख्या आता शून्य झाली आहे. इस्लामपूरमधील त्या 26 व्या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरातील कोरोना बाधित मृत व्यक्तीच्या संपर्कातील 15 जणांचे अहवाल सुद्धा निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
सांगली येथील कोरोनाबाधीत झालेल्या व रविवारी मृत्यू पावलेल्या रूग्णाशी संबंधित एकूण 16 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये सदर रूग्णाच्या कुटुंबातील 5 व्यक्ती होत्या. यापैकी आई, वडील, भाऊ व पत्नी, मुलगा यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कोरोना बाधित आणि मयत सदर व्यक्तीशी संबंधित संपर्क बाधित अन्य 11 जण इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये होते. त्यांचेही अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अद्याप आणखी 15 जणांचे रिपोर्ट येणे बाकी असून त्याचे जर रिपोर्ट निगेटिव्ह आले तर सांगली शहरावर आणि जिल्ह्यावरचा मोठा धोका टळला असे म्हणता येईल.
सांगलीत अचानक कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वेळीच हालचाली करत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.तर इस्लामपूर येथील कोरोना बाधीत कुटुंबाशी संबंधित महिला मिरज येथील आयसोलेशन कक्षात उपचार घेत होती. सदर महिलेचा दुसरा अहवालही निगेटीव्ह आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरानाची लागण झालेल्या 27 रूग्णांपैकी 26 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.