नवी दिल्ली : करोनामुळे गेल्या सुमारे ५० दिवसांपासून देशभरात विविध ठिकाणी स्थलांतरीत कामगार अडकून पडले आहेत. त्यातच लॉकडाउनच्या काळात पायी निघालेल्या मजूरांच्या एका समूहाला भरधाव बसने उडवल्याने ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशकडे निघालेल्या मजुरांच्या ट्रकला झालेल्या भीषण अपघातात झाल्याने त्यात ८ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर ५० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री या दोन्ही घटना घडल्या.
6 migrant workers who were walking along the Muzaffarnagar-Saharanpur highway killed after a speeding bus ran over them late last night, near Ghalauli check-post. Case registered against unknown bus driver. pic.twitter.com/s81e7gpYkH
— ANI UP (@ANINewsUP) May 14, 2020
करोनापासून बचावासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वात मोठा फटका स्थलांतरीत मजूर आणि कामगारांना बसला आहे. त्यामुळे अडकलेल्या मजुरांनी कोणत्याही प्रकारे घरी जाण्याचा मार्ग निवडला आहे. यातील काही पायी तर काही एकत्रित वाहनांची व्यवस्था करुन निघाले आहेत. त्यानुसार, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर-सहारनपूर महामार्गावरुन बिहारमधील स्थलांतरित मजूर आपल्या घरी पायी निघाले असताना त्यांना घलौली चेकपोस्टजवळ बुधवारी रात्री एका भरधाव बसनं चिरडलं. यातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, बुधवारी रात्री घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात मजुरांना घेऊन निघालेल्या एका ट्रकची बसला जोरदार धडक बसल्याने या ट्रकमधील ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर ५० जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील गुना येथे हा भीषण अपघात घडला. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.