नवी दिल्ली – परदेशी भूमीवर जाऊन भारत आणि भारतीयांवर टीका करणे, ही कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांची जुनी खोड आहे. मात्र, इटलीच्या पंतप्रधानांनी खुद्द नरेंद्र मोदींची सर्वोत्तम जागतिक नेते, अशी केलेली स्तुती तरी राहूल गांधी मान्य करतील का, असा प्रश्न भाजप नेते आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी विचारला आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यामुळे भाजप संतप्त झाला आहे. पक्षाचे नेते अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी राहुल यांचे वक्तव्य खोटे आणि भारताची बदनामी करणारे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “कालच्या निकालावरून कॉंग्रेस पुन्हा एकदा क्लीन स्वीप झाल्याचे दिसून येते. आणि राहुल गांधी पुन्हा एकदा परदेशी भूमीवर हे रडण्याचे काम करत आहेत.”
अनुराग ठाकूर म्हणाले, “हा पेगासस त्यांच्या हृदयात आणि मनात बसला आहे, इतर कुठेही नाही. पेगाससवर अशी काय मजबुरी होती की राहुल गांधींनी मोबाईल जमा केला नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेला हा नेता; ज्याला स्वत:चा मोबाईल लपवायचा होता. त्याने आणि इतर नेत्यांनी त्यांचे मोबाईल का जमा केले नाहीत?”
कॉंग्रेसला घेरताना क्रीडामंत्री म्हणाले, “जगात मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताचा जो आदर वाढला आहे, तो आज सर्वाधिक आहे, असे आम्ही नव्हे तर जगभरातील नेते सांगत आहेत. राहुलजी हे इतर कोणाचे ऐकत नसतात. आता इटलीचे पंतप्रधान म्हणतात की, मोदीजींवर जगभरात जे प्रेम आहे, ते जगाचे लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहे, त्यामुळे आज ते एक मोठे नेते बनले आहेत. इटलीच्या पंतप्रधानांचे विधान तरी राहूल गांधी आणि कॉंग्रेसचे नेते मान्य करतील का?
Punjab Budget session : राज्यपालाच्या अभिभाषणातील ‘त्या’ शब्दावरून पंजाब विधानसभेत जोरदार वादंग !
पुन्हा पुन्हा खोटे बोलणे, परकीय जमीन, परदेशी मित्र, विदेशी एजन्सी यांचा भारताची बदनामी करण्यासाठी वापर करणे ही सवय झाली आहे. हा द्वेष राहुल गांधींचा पंतप्रधानांप्रती असू शकतो, पण देशाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र जे त्यांच्या परदेशातून, कधी परदेशी मित्रांच्या माध्यमातून केले जाते, त्यामुळे कॉंग्रेसचा अजेंडा काय, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
राहुल गांधींना ईशान्येकडील निवडणुकांचे निकाल माहित असावेत. लोक नरेंद्र मोदींच्या सरकारवर कसा विश्वास दाखवत आहेत हे दाखवून देतात, त्यामुळे राहूल गांधींच्या अंगाचा तिळपापड झाला आहे.