अमरावती – प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे महायुतीचे घटक असूनही मागील काही काळापासून सातत्याने सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. अशातच प्रत्येक मतदारसंघात ‘मी खासदार’ हे अभियान राबवून 300 ते 400 उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, आम्हाला राज्यभरातून आमच्या कार्यकर्त्यांचे फोन येत होते. महायुतीत आपल्याला कुठल्याही प्रकारची विचारणा होत नाही, आपल्याला केवळ मतांपुरते गृहित धले जात आहे. आपण त्याचा बदला घेतला पाहिजे.
आपण निवडणुकीला उभे राहिले पाहिजे, अशी मतं आमच्या कार्यकर्त्यांनी मांडली. याशिवाय राज्यात प्रहारची ताकद असूनही आम्हाला निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने वागवले जात आहे, जे चुकीचे आहे. जर आमच्या कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळत नसेल तर आम्ही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहोत, असा इशारा त्यांनी दिला.
तसेच वेळ पडल्यास प्रत्येक मतदारसंघात आमचा उमेदवार उभा करू. शेतकरी, मजूर, गोरगरिब, वंचित आणि दलितांची मदत करणारा एखादा कणखर उमेदवार असेल तर आम्ही त्याच्या पाठिशी उभे राहू, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.