औरंगाबाद – मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकालात महाराष्ट्रातील 50 जातींना शिक्षणात आरक्षण देता येते, असा स्पष्ट उल्लेख केला आहे. कारण या जातींच्या सामाजिक राजकीय मागासपणाची आकडेवारी आणि माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे यानंतरही या जातींना शिक्षणात आरक्षण न देणे अन्याय आहे, असे म्हणत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
यावेळी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत महाराष्ट्रात मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी केली. सगळ्या मुस्लिमांना आरक्षण देऊ नका, पण उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात ज्या 50 जातींना आरक्षण देता येते म्हटले त्यांना द्या, असे मत ओवेसी यांनी व्यक्त केले.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, सरकारला आणखी कुणाला द्यायचे असेल तर त्यांनी द्यावे. मुस्लिमांचे सामाजिक, शैक्षणिक मागासपण सिद्ध झाले आहे. तरीही सरकार मुस्लिमांना आरक्षण देत नाही. यानंतर आमच्याकडे बोट करून आम्ही धार्मिक असल्याचे म्हणतात. हा अन्याय दूर झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे ओवेसी यांनी सांगितले.
सगळ्या मुस्लिमांना आरक्षण देऊ नका, पण उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात ज्या 50 जातींना आरक्षण देता येते म्हटले आहे, त्यांना द्या. आधी सरकार भाजपा-शिवसेनेचे होते. आता “थ्री इन वन’चे सरकार आहे. हे “थ्री अन वन’ देखील विसरून गेले. आता आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार करू शकते याचा संसदेत कायदाही मंजूर झाला आहे. संविधान समानतेविषयी सांगते. त्या आधारावर महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी ओवेसी यांनी केली.