संयुक्त राष्ट्र – इस्रायल- गाझा संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बोलावण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये पाकिस्तानकडून मंगळवारी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र या मुद्यावर प्रतिक्रिया देऊन पाकिस्तानचे महत्व वाढवणे गरजेचे नाही, असे सांगून भारताने पाकिस्तानवर टीका केली. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे दूत मुनीर अक्रम यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारताच्यावतीने संयुक्त राष्ट्रातील कायम उपप्रतिनिधी, राजदूत आर. रविंद्र यांनी ही प्रतिक्रिया दिली.
“माझ्या देशाचा अंतर्गत आणि अविभाज्य भाग असलेल्या केंद्रशासित प्रदेशांचा संदर्भ देत एका शिष्टमंडळाने नेहमीच्या सवयीप्रमाणे भाष्य केले आहे. मी वेळेच्या बचतीसाठी या टिप्पणीवर प्रतिसाद देऊन त्यांचा सन्मान करणार नाही,’ असे रवींद्र म्हणाले.
तत्पूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन यांनी या बैठकीत बोलताना सर्व प्रकारचा दहशतवादावर टीका केली होती.
पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबाकडून मुंबईमधील किंवा हमासकडून किबुत्झ बेरी येथील नागरिकांना मारणाऱ्या सर्व प्रकारच्या दहशतवादी कारवाया बेकायदेशीर आणि असमर्थनीय आहे. आपण कोणत्याही राष्ट्राचा स्वतःचा बचाव करण्याचा आणि अशा भीषण पुनरावृत्ती होण्यापासून रोखण्याच्या अधिकाराची पुष्टी केली पाहिजे. या परिषदेचा कोणताही सदस्य, या संपूर्ण संस्थेतील कोणतेही राष्ट्र आपल्या लोकांची कत्तल सहन करू शकत नाही, असे ते म्हणाले होते.