कर्मचारी भरती प्रक्रिया रखडली
पुणे – लष्कर परिसरातील करोना रुग्णांना अत्यावश्यक उपचार मिळावेत, यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालायात नवीन आयसीयू उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी रुग्णालयाला निधीदेखील मिळाला आहे. मात्र, अद्यापही कर्मचाऱ्यांअभावी रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू झालेला नाही. परिणामी, परिसरातील गंभीर अवस्थेतील रुग्णांना इतर रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत.
शहरात करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेत, लष्कर परिसर आणि इतर परिसरातील गंभीर अवस्थेतील रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी पटेल रुग्णालयात राज्य शासनाच्या सहकार्याने अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी तातडीने दोन कोटी 30 लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. हा विभाग लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, यासाठी रुग्णालयाकडून प्रयत्नदेखील केले जात आहे.
त्यानुसार विभागासाठी आवश्यक कर्मचारी, यंत्रणा आणि औषधे याबाबतचा प्रस्ताव बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुसार विभागासाठी 8 डॉक्टर, 16 परिचारिका, 4 स्पेशालिस्ट डॉक्टर, 10 आया आणि वॉर्डबॉय तसेच सफाई कामगार अशी मिळून सुमारे 40 कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र, अद्यापही कर्मचारी भरती न झाल्याने रुग्णालयातील अतिदक्षता विभाग कार्यान्वित झालेला नाही.
याबाबत बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार म्हणाले की, भरतीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. मात्र, अतिदक्षता विभागासाठी आवश्यक असलेली इतर यंत्रणा, रुग्णांसाठी औषधे घेणे गरजेचे आहे.