पुणे – इंडिया आघाडीत जागा वाटपावरून मतभेद आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला जागा देणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे इंडिया आघाडी यशस्वी होणार नाही, असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सोमवारी केला.
पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त पुणे दौऱ्यावर आले असताना तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपला उद्धव ठाकरे यांची आता अजिबात गरज नाही. अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे राज्य सरकारला स्थैर्य आले आहे. त्याचा उपयोग राज्याला होत आहे. तसेच, भाजपचे केंद्रात आणि त्याबरोबरच राज्यातही चित्र अधिक चांगले असेल, असेही ते म्हणाले.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे काम करत आहेत. येत्या काळात त्याचे चांगले परिणाम दिसतील. सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हे सरकार योग्य निर्णय घेईल. त्यातून सगळ्यांचेच भले होईल, असा विश्वास आहे. तसेच काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्यावरील कारवाईत समोर आलेली संपत्ती पाहता काँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट असेल, असे वाटत नसल्याचे ते म्हणाले.
भाजपला चांगल्या जागा मिळतील
हिंदी भाषिक राज्यातून भाजपला आजही समर्थन कायम आहे. दक्षिण भारतात भाजपचा प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे भाजपला अधिक चांगल्या जागा मिळतील,’ असेही तावडे म्हणाले.