कराड (प्रतिनिधी) – पाटण तालुक्यातील चाफळ विभागात पोलीस, आरोग्यासह सर्वच यंत्रणांनी करोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे चाफळ परिसर करोना विषाणू प्रादुर्भावापासून कोसो मैल दूर राहिला असल्याची भावना सर्वस्तरातून व्यक्त होत आहे. या अतुलनीय कामगिरीमध्ये विभागातील पोलीस, आरोग्य, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, आरोग्य सेविका, आशा वकर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्राम समित्या, पत्रकार यांचे मोठे योगदान राहिले आहे.
देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून करोनाविरूध्द एखाद्या योद्घयाप्रमाणे चाफळ विभागातील प्रशासनाची टीम निकराची झुंज देत आहे. बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकाची चौकशी करून आवश्यक बाबींची पूर्तता करूनच कधी मृदू तर कधी कठीण निर्णय घेत आत्तापर्यंत करोना विषाणू विरूध्दची लढाई यशस्वी करत आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात संचारबंदी असताना उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकवेळा सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व नागरिकांना पटवून देत गर्दी टाळण्याचे व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले गेले. याशिवाय पाटणचे तहसीलदार समीर यादव, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, पोलीस उपअधिक्षक अशोक थोरात यांनी वेळोवेळी नागरिकांना प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्यक्षभेटीतून नागरिकांना प्रशासन तुमच्या बरोबर असल्याचा विश्वास दिला आहे.
या विश्वासाला साजेसे काम येथील नागरिकांनी केले आहे. तरीही मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना विशेषतः तरुणांना पोलिसांनी कधी गोड भाषेत सांगून तर कधी चोप देऊन वठणीवर आणले आहे. शिवाय येथील बाजार, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ नये, याकरिता विशेष नियोजनही करण्यात आले होते. पोलीस, आरोग्य, महसूरल आदी सर्व प्रशासकीय विभागांच्या कर्तव्य दक्षपणामुळे चाफळ विभागात करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात यश आली आहे.
चाफळकरांची जबाबदारी मोठी
करोनाच्या लढाईत जनतेला वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या पोलीस, डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, परिचारिका, पोलीस पाटील, पत्रकार तसेच आशा वकर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस ग्रामस्तरीय यंत्रणा, सफाई कामगार यांना येत्या काळातही सहकार्यकरून चाफळ विभाग करोनामुक्त ठेवण्याची जबाबदारी चाफळ विभागातील सर्व नागरिकांना पार पाडावयाची आहे