वडगाव मावळ, दि. 18 – जनरल मोटर्सचा प्रकल्प गेल्याने 1600 कायमस्वरूपी तर 1800 हंगामी भूमिपुत्र बेरोजगार झाले आहेत. कंपनीच्या विरोधातील केसचा निकाल कामगारांच्या बाजूने लागला आहे. तरीदेखील कसलाही मोबदला कामगारांना मिळाला नाही. हा प्रकल्प आता हुंडाई कंपनीला दिला आहे. पण जोपर्यंत कामगारांना योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत हुंडाई कंपनीला पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत सरकारला दिला. हुंदाई कंपनीचे स्वागत आहे. पण पूर्वीच्या कामगारांचा विचार करावा लागेल, असेही शेळके म्हणाले.
अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान मावळ तालुक्यातील अवैध धंदे, पुलांची कामे, पवना सिंचन योजना, वीजनिर्मिती, पर्यटनाला चालना या सारख्या प्रश्नांवर आ. शेळके यांनी आवाज उठवला. यावेळी बोलताना शेळके म्हणाले की, जलसंपदा विभागाकडे नऊ महिन्यांपासून पुलाची मागणी करत आहोत. मागील सरकारच्या काळात 8 पुलांची कामे मंजूर केली होती. मात्र एकाही पुलाच्या कामाला या सरकारने निधी दिला नाही. पवना सिंचन योजनेंतर्गत आढले, डोणे, चांदखेड गावांचा सिंचनाचा प्रश्न सुटल्यास 2000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, यासाठी प्रयत्न करत आहोत. पण तो प्रस्तावही “जैसे थे’ ठेवला आहे.
मावळ तालुक्यात अनेक धरणांमधून वीजनिर्मिती होते. काही वर्षांपूर्वी एका ठिकाणी अपघात घडल्याने तिथे बोटिंग बंद करण्यात आले. सरकारने वीजनिर्मिती होणाऱ्या धरणांमध्ये काही अंतर राखून बोटिंगसाठी परवानगी द्यावी. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल व भूमिपूत्रांना रोजगारही मिळेल.
मावळ तालुक्यात होणारा वेदांत फॉक्सकॉन सारखा प्रकल्प राज्याबाहेर गेला. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांचा रोजगार गेला. मावळमध्ये मूलभूत सुविधा आहे. तरी भविष्यात एखादा चांगला प्रकल्प यावा याकरिता आमच्या सारखी सकारात्मक भूमिका सरकारनेही घ्यावी.
वडगाव कातवी जमिनीवर एमआयडीसीचे शिक्के टाकण्यात आले. परत ते काढण्यासाठी अद्यापही नोटिफिकेशन काढले नाही. तालुक्यातील टाटाच्या धरणात वीजनिर्मिती केली जाते. मात्र पूर्ववसन झालेल्या गावांना ही वीज दिली जात नाही. येथील वीज मुंबईला दिली जाते. या भागांतील वाड्यापाड्याना आदिवासीभागांना काही प्रमाणात कर आकारून वीज द्यावी. मावळ आणि खेड एकत्रित डिव्हिजन असल्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळाला किंवा कसली परवानगी घेण्यासाठी खेडला जावे लागते. त्यामुळे मावळला वेगळे डिव्हिजन द्यावे.
विद्येच्या माहेरघरात अवैध धंदे तेजीत
पुणे जिल्हा विद्यचे माहेर घर आहे. परंतु येथे अवैध धंदे जास्त प्रमाणात सुरू असल्याचा आरोप आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत बोलताना केला. शिक्षणासाठी आलेल्यांपैकीं 50 टक्के विद्यार्थी व्यसनाधीन झाले आहेत. कमी पैशात गांजा, हातभट्टी भेटत आहे. ज्या ज्या ठिकाणी असे अवैध धंदे सुरू असतील त्यावर ग्रहविभागाने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.