पुणे- आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील पोंदेवाडी येथे शनिवारी (दि. 18) रोजी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यानेही अनेक शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली आहेत. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूज यांनी केली आहे.
राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस होणारं असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी, लाखणगाव, बढेकरवस्ती येथे गारपीट झाली आहे. पोंदेवाडी, लाखनगाव येथे मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून रस्त्यावर अक्षरशः खडे साचले होते.
सध्या सर्वत्र शेतामध्ये गहू, ऊस, ज्वारी यासह अनेक पिके काढणीला आली आहेत, काही शेतकऱ्यांनी आपल्या काढणीला आलेली पिके काढली आहेत तर काही काढणीला असणारी पीके भुई सपाट झाली आहे, अशी माहिती पोंदेवाडी चे माजी सरपंच बबनराव वाळुंज यांनी दिली.
शेतातच गव्हाच्या ओंब्या, हरभरे, कांदे, बटाटा ही पिके खराब झाली आहेत. दरम्यान अचानक झालेल्या या गारपिटीमुळे शेतातील पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असल्याचे चित्रही दिसून आले. यात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने नुकसानग्रस्त शेती पिकांचा तात्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी प्रगती शेतकरी मारुती वाळुंज यांनी केली आहे.
दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसापासून जुनी पेन्शन मागणीसाठी सर्व तलाठी वर्ग आंदोलनात सहभागी झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे कोण करणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.