पुणे – एका खासगी बॅंकेच्या एटीएमच्या सुरक्षेसंदर्भात जबाबदारी असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने वाहतूक पोलिसांच्या मदतीने बॅंकेच्या एटीएममधून पैसे चोरणाऱ्या दोघांना अटक केली. हे दोघे मूळचे उत्तर प्रदेशातील असून ते एटीएम सेंटरला पैसे निघत असलेल्या जागेवर पट्टी लावत होते. एखाद्या ग्राहकाने पैसे काढल्यास ते बाहेर पडत नसत. ग्राहक निघून गेल्यावर हे दोघे पट्टी काढून पैसे घेत होते.
याप्रकरणी मन्नैया टंकेदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आशिष हरिकेश विश्वकर्मा (29) आणि नायब लालचंद पटेल (28) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे दोन साथीदार फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. एका खासगी बॅंकेच्या एटीएमची सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही सर्व्हिलंन्सची जबाबदारी “पीओटी चेन सोल्युशन’ कंपनीकडे आहे. त्यांनी प्रत्येक एटीएम सेंटरमध्ये सेन्सर लावले आहेत. यामुळे कोणी काही छेडछाड केल्यास त्वरित अलर्ट जातो.
मंगळवारी शनिवारवाडा येथील एटीएममध्ये छेडछाड झाल्याचा अलर्ट आला. तेव्हा टंकेदार हे वारजेवरून निघाले होते. त्यांनी तातडीने सर्व्हिलंन्स रुमला सीसीटीव्ही तपासण्यास सांगितले. दरम्यान, ते पोहचेपर्यंत त्यांना अप्पा बळवंत चौकातील एटीएममध्ये छेडछाड झाल्याचे अलर्ट आला. ते तेथे गेले असता, आतमध्ये दोघे आरोपी चिकटपट्टी काढून पैसे काढत असताना दिसले. त्यांनी तातडीने एटीएमचे शटर लावून घेतले.
चौकात हजर असलेले वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे, अंमलदार कांतीलाल बनसोडे आणि बाळकृष्ण चव्हाण यांना माहिती दिली. त्यांनी शटर उघडून दोघाही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना विश्रामबाग पोलिसांकडे सोपवण्यात आले.
“दोघाही आरोपींकडून दहा हजारांची रोकड आणि दोन मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. या टोळीने इतर राज्यांत असे गुन्हे केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.” – दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक, विश्रामबाग