खेड तालुक्यात ढापे न बसवल्याने केटी बंधारे कोरडेठाक
रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – खेड पाटबंधारे विभागाने नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याना ढापे न बसविल्यामुळे आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षपणाचा फटका शेतकऱ्याला बसला असून याबाबत शेतकरी वर्गातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
खेड तालुक्यात अनेक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. दरवर्षी या बंधाऱ्यात पाणीसाठवे यासाठी परतीच्या पावसाच्या अंदाजानुसार ढापे बसविण्यात येतात त्यामुळे त्या बंधाऱ्यात पाणी साठते व पुढे शेतीसाठी आणि पिण्यासाठी या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग होतो. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून संबंधित ग्रामपंचायतीकडून निधीची तरतूद होते. यावर्षी मात्र तालुक्यातील काही बंधाऱ्यांना ढापे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे ते कोरडेठाक पडले आहेत.
खेड तालुक्यात सध्या अनेक बंधाऱ्यात पाणी नसल्याने बागायती विशेषतः कांदा पिकाची लागवड झालेल्या शेतीला पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. कांदा लागवडी वाचुन कांदा रोपे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. चासकमान धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. नदीपात्रात वेळेत पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांचे बागायती हंगामी पिके घेण्याचे वेळापत्रक कोलमडणार आहे.
तालुक्यातील परिस्थिती बिकट
खेड तालुक्यात भीमा, भामा नदीत चास कमान धरण व भामा आसखेड धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी तालुक्यातील परिस्थिती बिकट आहे. नदीकाठच्या आणि नदीवरुन अनेक शेतकऱ्यांनी सामुदायिक पाणीपुरवठा योजना 1 ते 10 किलोमीटरपेक्षा अधिक लांबपर्यत केल्या आहेत. यंदा परतीचा पावसाने लवकर दडी दिल्याने रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत
पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत नद्यावरील कोल्हापुरी बंधारे पाऊस आणि वाहत्या पाणी प्रवाहाचा अंदाज घेऊन बंधाऱ्याचे ढापे टाकून पाणी अडविण्यात येते; मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाक केल्याने नदीपात्र कोरडे ठणठणीत पडले आहे. त्यात पाणी न अडवल्याने भविष्यात शेतीला मुबलक पाणी मिळणार नसल्याने शेतकरी वर्गावरचे संकट वाढले आहे. अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे.
वनराई बंधारे बांधणे “लाल फितीत’
खेड तालुक्यात वनराई बंधारे उभारण्याचे विविध शासकीय खातेप्रमुखांची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. मात्र त्यांच्या आदेशाला स्थानिक अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. परतीचा पाऊस लवकर गेल्याने पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे वनराई बंधारे बांधणार कोठे हा प्रश्नसमोर आला त्यामुळे ही योजना जवळपास “लाल फितीत’ राहणार आहे. बंधारे बांधण्यासाठी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने यावर्षी पाणीटंचाई भासणार आहे.
पाणी सोडून बंधारे भरा
मलघेवाडी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला ठेकेदाराकडून ढापे न मिळाल्याने बसविण्यात आले नाही. जिल्हा परिषदेकडून एक कोटी रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला मात्र यावर्षी पाणीसाठा झालाच नाही. याकडे अधिकरी वर्गाने दुर्लक्ष केले त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र गैरसोय होणार आहे. नदी पात्रातील बंधाऱ्यांचे ढापे तात्काळ बसविण्यात यावेत व धरणातून पाणी सोडून ते भरण्यात यावेत अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.