मुंबर्ई – अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग या संस्थेने गेल्या वर्षी अदानी समूहातील कंपन्यावर अयोग्य कामकाजाचा आरोप केला होता. तो आरोप केवळ अदानी समूहावर नव्हता तर भारतातील सरकारच्या कामकाजावरचा हल्ला होता, असे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी म्हटले आहे. हिंडेनबर्गला भारत सरकारला राजकीयरीत्या बदनाम करायचे होते असे अदानी यांना वाटते.
येथे एका खासगी कार्यक्रमात बोलताना अदानी यांनी सांगितले की, आमच्यावर करण्यात आलेल्या आरोपाची चौकशी झाली आणि स्वतः सर्वोच्च न्यायालयाने आता आणखी चौकशी करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आमची प्रतिमा अधिक उजळ झाली आहे.
अदानी समूहातील कंपन्या ताळेबंदात फेरफार करतात, शेअरच्या किमती वाढविण्यासाठी प्रयत्न करतात असा आरोप हिंडेनबर्गने केला होता. या आरोपानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले. 2023 च्या सुरुवातीला अदानी जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते ते आता जगातील विसाव्या क्रमांकाचे श्रिमंत व्यक्ती आहेत.
दरम्यानच्या काळामध्ये अदानी समूहातील बहुतांश कंपन्यांच्या शेअरचे भावपूर्वपदावर आले आहेत. आपली प्रतिमा उजळ करण्यासाठी या समूहाला बरेच प्रयत्न करावे लागले होते. एका खासगी कार्यक्रमात बोलतांना अदानी म्हणाले की आरोपनंतर आम्ही भांबावुन न जाता आमची भूमिका स्पष्ट केली आणि आता अधिक मजबूत होऊन पुन्हा कामकाज करीत आहोत. उद्योजकतेत जोखीम घ्यावी लागते. यावेळी अनेकदा आपला पराभव होतो. मात्र त्यामुळे खचून न जाता उठून पुन्हा आपला प्रवास सुरू करणे महत्त्वाचे असते.
अदानी समूहाचे कामकाज सध्या ऊर्जा निर्मिती, विमानतळ, खाण, अक्षय ऊर्जा, नैसर्गिक वायू, सिमेंट आणि मीडिया क्षेत्रात चालू आहे. ते म्हणाले की, एखादी व्यक्ती जास्त यशस्वी होत असेल तर तिच्या पुढची आव्हाने मोठीे असतात. त्यापुढे डगमगून जाण्याची गरज नसते. आपण अनुभवाच्या आधारावर खूप शिकलो आहेत आणि ध्येय समोर ठेवून गुंतागुंतीचा प्रवास करण्यात यशस्वी झालो आहोत.
पायाभूत सुविधाची गरज –
भारताला पायाभूत सुविधा विकसित करण्याची गरज आहे. या दृष्टिकोनातून आपण या क्षेत्रामध्ये जास्त काम करीत आहोत. सुरुवातीला आपण कोळसा उत्पादनात होतो. कोळसा उत्पादनापासून ऊर्जा निर्मिती होते. त्यामुळे आपण आता ऊर्जा निर्मिती सुरु केली आहे. असे उद्योग वाढत जातात. आपण जितके मोठे होतो तेवढा आपला तिरस्कार केला जातो किंवा आपल्यावर टीका केली जाते. मात्र अशा परिस्थितीतही आपण विनय सोडता कामा नये असे ते म्हणाले.