नवी दिली – हिंडेनबर्ग या अमेरिकेतील संशोधन संस्थेने अदानी समूहावर गैरप्रकारचे आरोप एक वर्षांपूर्वी केले होते. या आरोपानंतर अदानी समूहातील बर्याच कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यानंतर अदानी समूहाने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता या समूहातील कंपन्यांच्या शेअरचे भाव वेगाने पूर्वपदावर येत आहेत. आम्ही या आरोपामुळे आणखी मजबूत झालो अशी प्रतिक्रिया अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी दिली आहे.
आम्ही आमची बाजू स्पष्ट केली. आमच्यावर गुंतवणूकदारांनी विश्वास दाखविला आहे. दरम्यानच्या काळात आमच्या कंपन्यांच्या नफ्यात आणि महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आम्ही अधिक नवे प्रकल्प हाती घेत आहोत. या आरोपांनंतर अदानी समूहाने बरीच गुंतवणूक आकर्षित केली आहे. आम्ही 40 हजार कोटी रुपये उभे केले. त्यामुळे आम्हाला पुढील दोन वर्षात आता भांडवलाची फारशी गरज भासणार नाही.
17 हजार कोटी रुपयांचे कर्ज अगोदरच परत करण्यात आले आहे. दुसर्या तिमाहीत आमच्या कंपन्यांनी विक्रमी नफा कमविला आहे. आमचे या वर्षाच्या सुरुवातीला झालेले नुकसान भरून निघाले आहे. आता आम्ही पुन्हा 4.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. यावर आगामी काळात कसलाही परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.
हरित ऊर्जा क्षेत्रात देशभरात अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील धारावी येथे झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. हिंडेनबगर्र्ने आरोप केल्यानंतर अदानी समूहाचे बाजार मूल्य 150 अब्ज डॉलरने कमी झाले होते. यातील बरीच झीज भरून निघाली आहे. 2023 च्या सुरुवातीला अदानी जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. आता ते 20 व्या क्रमांकावर आले आहेत.
आमच्यावर प्रथमच आरोप झाले होते. त्यामुळे या आरोपाचा सामना कसा करायचा यात माहिती आम्हाला नव्हती. मात्र मुळातच आमचा कारभार पारदर्शक असल्यामुळे आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागले नाहीत.
किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान
आमच्यावर आरोप झाले तेव्हा आमच्यापेक्षा आमच्या कंपनीत गुंतवणूक केलेल्या किरकोळ गुंतवणूकदारांचे जास्त नुकसान झाले ही खेदाची बाब आहे. मात्र काही संस्थागत गुंतवणूकदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि गुंतवणूक चालू ठेवली. यामुळे भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प रखडले नाहीत ही समाधानाची बाब आहे. आता कंपनीचे 17 लाख इतके भागधारक आहेत. त्यामुळे आता या भागधारकांच्या मदतीने आगामी काळात आम्ही उत्तम कार्य करणार असल्याचे ते म्हणाले.