लॉकडाऊनमध्ये घटले होते मृत्यू : जूनपासून वाढतोय मृत्यूचा आकडा
– प्रकाश गायकर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाने धुमाकूळ घातला आहे. मार्च महिन्यात करोनाने शहरात प्रवेश केला. कडक लॉकडाऊनच्या काळात मृत्यूचे प्रमाण खूपच कमी होते. गेल्या दहा वर्षांतील सर्वांत कमी मृत्यू मार्च ते मे दरम्यान नोंदले गेल्याचे त्यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु “करोना’ने आपला पाश आवळण्यास सुरुवात करताच मृत्यूचा आकडा देखील झपाट्याने वाढू लागला. “अनलॉक’ सुरु होताच मृत्यूही वाढू लागले. जून ते ऑगस्टमध्ये झालेले मृत्यू हे गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक मृत्यू असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या दोन दिवसात करोनाबाधितांचे आकडे कमी झाले असले तरी सहा महिन्यांमध्ये शहरामध्ये 78 हजाराहून अधिक रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. तर तब्बल 1790 जणांचा मृत्यू झाला आहे. मार्च महिन्यामध्ये शहरामध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये रुग्णवाढीचा दर कमी होता. मे महिन्याच्या 30 तारखेपयर्यंत शहरात 511 जणांना करोनाची लागण झाली होती. तर 20 जणांचा मृत्यू झाला होता.
मागील पाच वर्षाच्या तुलनेच मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मृत्यूदर कमी होता. मागील पाच वर्षाच्या तुलनेत या महिन्यांमध्ये मृत्यू कमी झाले होते.
मार्च महिन्यात 2016 ते 2019 या वर्षात अनुक्रमे 714, 973, 937 व 865 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र यंदा मार्च महिन्यामध्ये त्याहून कमी म्हणजेच 692 जणांचा मृत्यू झाला. एप्रिल व मे महिन्यामध्येही काहीशी तशीच परिस्थिती होती. मात्र जून महिन्यापासून मृतांच्या संख्येमध्ये वाढ झाली.
जून महिन्यामध्ये मागीलवर्षी 646 जणांचा मृत्यू झाला होता. तर यावर्षी 725 जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच मागीलवर्षीच्या तुलनेत जून महिन्यामध्ये 79 अधिक जणांचे मृत्यू वाढले. तर जुलै महिन्यामध्ये यामध्ये सर्वाधिक वाढ झाली. मागील पाच वर्षांच्या तुलेनत जुलै महिन्यामध्ये मृत्यूचा आलेख वाढला आहे. 2016 ते 2019 पर्यंत मार्च ते ऑगस्ट या महिन्यात शहरातील मृतांची संख्या अनुक्रमे 800, 692, 862, 790 अशी होती. तर यावर्षीच्या जुलै महिन्यामध्ये त्यामध्ये वाढ होऊन एकाच महिन्यात तब्बल 1311 जणांचा मृत्यू झाला.
ऑगस्ट महिन्यामध्येही त्यामध्ये कमालीची वाढ झाली. 2016 ते 2019 या कालावधीत ऑगस्ट महिन्यामध्ये शहरातील मृतांची संख्या अनुक्रमे 869, 946, 1191 व 1145 अशी होती. यावर्षी त्यामद्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यंदा ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल 1655 जणांचा मृत्यू झाला आहे.
का वाढले मृत्यू?
एकूण मृत्यू पाहता “करोना’चा आकडा मोठा आहे. परंतु इतर आजार व कारणानेही मृत्यू झाले आहेत. जुलैपासून करोनाबाधितांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली. महापालिकेचे वायसीएम रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांसाठी मोठा आधार आहे. हे रुग्णालय पूर्णपणे कोविडसाठी समर्पित करण्यात आले. तसेच शहरातील इतर खासगी रुग्णालयांचे बेडही करोनासाठी आरक्षित करण्यात आले. परिणामी संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा ही करोनाला आटोक्यात आणण्यासाठी कामाला लागली. बहुतेक रुग्णालयांमध्ये करोनाचे रुग्ण असल्याने इतर रुग्णांनी उपचार घेण्यात उशीर केला. त्याचप्रमाणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये करोना रुग्ण असल्याने इतर आजाराच्या गरीब रुग्णांपुढील पर्याय संपुष्टात आले.
सप्टेंबरमधील मृत्यू धडकी भरवणारे
महापालिका प्रशासनाकडे सप्टेंबर महिन्यांची आकडेवारी उपलब्ध नसल्याने ती मिळू शकली नाही. मात्र या महिन्यामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. शहरात 30 जुलैपर्यंत 409 एवढे मृत्यू झाले होते. तर तीच संख्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस 1052 इतकी झाली. तर त्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 738 मृतांची भर पडली. शहरात 29 सप्टेंबरपर्यंत 1790 जणांचा मृत्यू झाला.
करोनाच्या काळात शहरामध्ये इतर ठिकाणाहून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या कालावधीत मृतांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. बाहेरून येणाऱ्या करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. ते वेळेत रुग्णालयात पोहचत नसल्याने मृत्यू होत आहे. त्यामुळे या वर्षी मृतांचा आकडा मोठा दिसत आहे.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी.