इंदापूर तालुक्यातील वास्तवता : प्रशासनाकडून कोलदांडा
निमसाखर – इंदापूर तालुक्यातील बीकेबीएन रहदारी आणी महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर छोटे-मोठे 12 ओढे आहेत. रस्त्याचे काही अंतर समांतर नीरा नदीशी आहे. पावसाळ्यात पाच ओढ्यांवर नदीचे पाणी येत असल्याने हा रस्ता बंद होत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम होत असताना ओढ्याची उंची वाढवणे गरजेचे आहे. परंतु संबंधित प्रशासनाकडून या कामाला बगल दिली असल्याचा सूर उमटत आहे.
बारामती-कळंब-बावडा-नरसिंहपूर हा रस्ता 74 किलोमीटरचा आहे. रस्त्याचे सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून दर्जेदार काम झाले. यानंतर अनेक मंत्री आले आणि गेले. मात्र, या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. बारामती- नरसिंहपूर रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून सुरुवातीला मान्यता होती.
यानंतर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून राज्यमार्ग म्हणून बढती मिळाली. यानंतर पूर्वीपेक्षा या रस्त्यावर दुरुस्तीसाठी मोठा निधी उपलब्ध होत गेला. तरी देखील सध्या बावडा ते बारामती रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. बावडा- कळंब- बारामती हा रस्ता आहे.
या रस्त्यावर इंदापूर हद्दीतील 12 साकव पद्धतीचे ओढ्यावर पूल आहेत. रस्त्याला समांतर नीरा नदी असल्याने यातील निरवांगीलगतचा एक, निमसाखरअंतर्गत येणारे 2 तर चिखली गावालगतचा व उद्धटजवळील एक असे मिळून पाचही ओढ्यांवर नीरा नदीचे पावसाळ्यामध्ये पाणी येते.
एकूण बारा ओढ्यांपैकी पाच ओढ्यांवर नीरा नदीचे पाणी येते. उरलेल्या आठ ओढ्यांवर बऱ्यापैकी पावसाळ्यामध्ये पाणी वाहत असते. रस्तेही बंद होत असतात. अशा ओढ्यांची देखील उंची वाढवण्याचे काम होणे गरजेचे आहे. या भागातील ग्रामस्थ व प्रवाशांकडून मागणी होत आहे.
दरम्यान, नृसिंह मंदिर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून नरसिंहपूर भागाचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. या गावाच्यामध्ये शिंदे वस्ती ते पिंपरी बुद्रुकपर्यंत सात किलोमीटरचा रस्त्याचे तर पुढे पिंपरी बुद्रुक ते जाधव वस्ती हा पाच किलोमीटर असा मिळून बारा किलोमीटरचा रस्त्याचे काम जोरदार झाले आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये नीरा नदी दुथडी भरून वाहत होती. त्यावेळीच्या पूरस्थितीमध्ये प्रशासनाने देखील ड्रोन कॅमेरेद्वारे या भागाचा सर्व्हे प्रशासनाकडून केला होता. त्यामुळे संबंधीत बांधकाम खात्याकडून पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांनी केली आहे.