अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे प्रवाशी धास्तावले
कविता शेटे
सांगली – महाराष्ट्र शासनाने जून 2017 साली शिवशाही या नव्या वातानुकूलित बसेस एसटी महामंडळात दाखल केल्या. सुमारे अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या स्वप्न प्रकल्पातून शिवशाहीला सुरुवात झाली. कमी खर्चात वातानुकूलित आरामदायी प्रवास अशी शिवशाहीची ओळख निर्माण केली गेली. सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी शिवशाही आज मात्र अपघातांच्या ग्रहणाने वेढली आहे. दिवसेंदिवस शिवाशाही बसेसच्या होत असलेल्या अपघातांमुळे “शिवशाहीची सफर म्हणजे दु:खद खबर’ अशा प्रकारची भीतीच प्रवाशांमध्ये निर्माण झाल्याने शिवशाहीच्या प्रवासाकडे प्रवाशी पाठ फिरवू लागले आहेत.
पुणे मुंबईकडे विनाथांबा लांबचा प्रवास करण्यासाठी मुख्यत: शिवशाहीची निर्मिती करण्यात आली. नागरिकांच्या हितासाठी अगदी माफक दारात विनाथांबा वातानुकूलित बस सेवा उपलब्ध केली गेली. प्रत्येक बस मध्ये 45 प्रवासी क्षमता आहे. महामंडळाकडे असणाऱ्या शिवशाही गाड्या या खाजगी कंत्राटदारांच्या आहेत. कंत्राटदास प्रति किलोमीटर 18 रुपये भाडे दिले जाते. याशिवाय इंधन, चालक, टोल यासह इतर सगळे खर्च महामंडळाची जबाबदारी असते. अशी ही शिवशाहीची बस सेवा अगदी ग्रामीण भागापर्यंत पसरलेली आहे. खासगी वाहन चालकांना आळा घालण्यासाठी शिवशाहीची निर्मिती करण्यात आली होती. परंतु वाढत्या अपघातांमुळे प्रवासी पुन्हा एकदा खासगी वाहनांकडे वळताना दिसत आहेत.
शिवशाहीला लागलेले अपघातांचे ग्रहण नेमके कशामुळे? याची प्रमुख कारणे विचारात घेतली तर महामंडळाच्या एसटी ड्रायव्हर लाच शिवशाहीची सूत्रे देण्यात आली तसे पाहिले तर शिवशाहीच्या चालकांना त्यासाठी विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक होते. ते न दिल्याने अपघातांचे प्रमाण वाढले. शिवशाही करारात खासगी चालकांना महामंडळातून तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन प्रवासी सेवेत रुजवण्याचा करार आहे. मात्र प्रशिक्षण न घेतल्यामुळे अपघातांच्या दुर्घटनेत वाढ झाली आहे. याबरोबरच अतिवेगाने गाडी चालवून नियंत्रण सुटणे, पुरेशी झोप नसणे, घाटमाथ्यावर बसच्या लांबीचा अंदाज न येणे, चालकांवर कामाचा वाढता ताण, शिवशाहीवर महामंडळाचा नियंत्रणाचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था ही काही प्रमुख कारणे सांगता येतील. त्याचबरोबर शिवशाहीच्या देखभालीची व दुरुस्तीची जबाबदारी ही कंत्राटदारांवर सोपवलेली असल्याने याचा सर्वाधिक फटका शिवशाहीला बसत आहे.
सांगली व मिरज मधून संपूर्ण महाराष्ट्रात शिवशाहीच्या दररोज 53 फेऱ्या होतात, यामध्ये मिरज ते नाशिक दोन फेऱ्या, मिरज ते मुंबई सेंट्रल दोन फेऱ्या, सांगली ते शेगाव दोन फेऱ्या, सांगली ते पुणे 36 फेऱ्या, सांगली ते नाशिक दोन फेऱ्या, विश्रामबाग ते पुणे दोन फेऱ्या, विश्रामबाग (सातारा मार्गे) ते पुणे चार फेऱ्या, विटा ते बेंगलोर दोन फेऱ्या, विटा ते मुंबई सेंट्रल दोन फेऱ्या होत असतात. परंतु शिवशाहीचे वाढते अपघात यामुळे प्रवाशांचा कल खासगी वाहनांकडे वळू लागलेला आहे.
अपघात टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज
एसटी महामंडळाने योग्य त्या उपाययोजना करून प्रशिक्षित चालक शिवशाहीवर नेमणे आवश्यक आहे. जनमाणसात असणारी एसटी महामंडळाची प्रतिमा उज्वल राखण्यासाठी व प्रवाशांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी शिवशाहीचे होणारे अपघात कशा पद्धतीने टाळता येतील याचा विचार एसटी महामंडळ यांनी करणे गरजेचे आहे. नाहीतर “शिवशाही शवशाही होईल’ यात शंका नाही. वाट पाहिन पण एसटीनेच जाईन हा सामान्य प्रवाशांच्या मनात असणारा विश्वास टिकवण्यासाठी महामंडळाला योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे.
तीन वर्षांत 550 अपघात, 51 ठार, 371 गंभीर
1 जून 2017 ते 25 नोव्हेंबर 2019 या काळात राज्यभरात शिवशाही बसचे एकूण 550 अपघात झाले. यामध्ये 51 प्रवाशांनी आपला जीव गमावला तर 371 गंभीर जखमी आहेत. यापैकी 442 अपघात एप्रिल 2018 ते डिसेंबर 2019 या कालावधीत झाले. शिवशाही अपघातांच्या एकूण संख्येचा विचार केल्यास ही सेवा सुरू झाल्यापासून दररोज सरासरी एक ते दोन अपघात होत आहेत. एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास हे ब्रीद वाक्य कुठेतरी मागे पडत असल्याचे चित्र दिसत आहे.