नवी दिल्ली – महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल सकाळी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने महाराष्ट्रासह पाच राज्यांना अलर्ट दिला आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटक आदी पाच राज्यात 10 हजाराहून करोनाचे सक्रिय रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या पाच राज्यांनी डोकेदुखी वाढवल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
करोनाचे आव्हान अजूनही संपुष्टात आलेले नाही. दुसरी लाट नियंत्रित करण्यात आपण काही प्रमाणात अपयशी ठरल्याचे म्हणू शकतो. आपल्याला निरंतर प्रयत्न करण्याची गरज आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटकात दहा हजारांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
देशात गेल्या आठवड्यात एकूण पॉझिटिव्हीटी रेट 1.68 टक्के होता.
पूर्वी हाच रेट 5.86 टक्के होता. अरुणाचल प्रदेश आणि आसामसह 28 जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आणि 10 टक्क्यांच्या आत आहे. म्हणजे या ठिकाणी संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. तर 34 जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्याहून अधिक विकली पॉझिटिव्हीटी रेट आढळून आला आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचीही माहिती दिली. राज्यांमध्ये रुग्णालयांमध्ये एकूण 8.36 लाख बेड तयार करण्यात आले आहेत. त्यात 9.69 लाख आयसोलेशन बेड आहेत. तर देशभरात 4.86 लाख ऑक्सिजन बेड आहेत. अशा प्रकारे 1.35 लाख आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत. डॉ. व्हिके पॉल यांच्या म्हणण्यानुसार, रोज 4.5 ते 5 लाख रुग्ण येतील हा अंदाज बांधूनच सरकार तयारी करत आहे. पहिला डोसच्या 71 टक्के व्हॅक्सिनेशनपर्यंत गेल्यावर करोना रुग्णांच्या संख्येत कशा पद्धतीने वाढ होणार याची मोजदाद करण्यासाठी आपल्याकडे कोणाताही फॉर्म्युला नाही.