मुंबई – राज्य शासनाच्या वतीने संत साहित्य आणि मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा “ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारा’चे आळंदी येथे उद्या, रविवारी सायंकाळी 6.30 वाजता वितरण करण्यात येणार आहे. हभप बद्रीनाथ तनपुरे (2019-20), हभप बाबा महाराज सातारकर (2020-21), स्वामी श्री गोविंददेव गिरी (2021-22), मा. बाभूळगांवर शास्त्री मंहत (2022-23) यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी “ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते. 5 लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
दरम्यान, यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवीतकर, डॉ. यू. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, उषा देशमुख, हभप निवृत्ती महाराज वक्ते, डॉ. किसन महाराज साखरे, मधुकर जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.