पुणे – अवकाळीने घातलेल्या धुडगुसामुळे द्राक्ष बागांचे झालेले नुकसान व थंडीने पाठ फिरविल्याने फळधारणा होण्यास झालेल्या विलंबाने निर्यातक्षम द्राक्षांचा हंगाम एक महिना लांबला आहे. गतवर्षी 1 जानेवारीला सुरू झालेला हंगाम यंदा 1 फेब्रुवारीला सुरू होणार आहे.
राज्यात नाशिक, सोलापूर व सांगली जिल्ह्यांबरोबरच पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरात द्राक्षांचे मोठे उत्पादन घेतले जाते. यापैकी नाशिक जिल्ह्यातील काही तालुके तर, बिगर मोसमी हंगामातील द्राक्ष निर्यात करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नारायणगावमधील द्राक्षांना स्थानिक बाजारपेठेत मागणी अधिक असते, तर सांगलीतील द्राक्षांपासून बेदाणे तयार करण्यास प्राधान्य दिले जाते.
मात्र, या चारही जिल्ह्यांतील द्राक्ष उत्पादनाला यंदा अवकाळीचा मोठा फटका बसला. जवळपास 50 टक्के उत्पादनावर परिणाम झाला. अवकाळीच्या तडाख्यातून बचावलेल्या बागांमधील वेलींवर द्राक्षमणी बहरण्यासाठी आवश्यक थंडीच गायब झाल्याने फळधारणा योग्य प्रमाणात झाली नाही. त्यामुळे निर्यातीसाठी असलेली द्राक्ष बागायतदारांची धावपळ आता कमी झाली आहे.
सध्या काही द्राक्ष बागांमधून फळे काढणीला सुरुवात झाली आहे. तरीदेखील आवश्यक त्याप्रमाणात मालाची आवक होत नाही. गतवर्षी 1 जानेवारीपर्यंत भारतातून रशियाला दीड हजार कंटेनरची निर्यात झाली होती. तर ती आतापर्यंत अवघी 51 कंटेनर एवढी झाली आहे. नाशिकमधील सह्याद्री फार्मच्या वतीने युरोपात द्राक्षांचा पहिला कंटेनर निर्यात केला आहे.