नवी दिल्ली – केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरूवारी विधानसभेतील अभिभाषण अवघ्या १.२४ मिनिटात आटोपले. त्या कृतीतून केरळमधील डाव्या पक्षांच्या सरकारशी राज्यपालांचा संघर्ष कायम असल्याची प्रचिती पुन्हा आली.
केरळ विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ राज्यपालांच्या अभिभाषणाने झाला. राज्यपाल सकाळी ९ च्या सुमारास विधानसभेत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अभिभाषणातील केवळ अखेरचा परिच्छेद वाचला. त्यामुळे त्यांचे अभिभाषण ९ वाजून २ मिनिटे होण्याआधीच समाप्त झाले. त्यापाठोपाठ ९ वाजून ४ मिनिटांनी ते विधानसभेतून बाहेर पडले. केरळ सरकार आणि राज्यपालांमध्ये सातत्याने विविध मुद्द्यांवरून संघर्ष होत आहे.
त्याचेच पडसाद अभिभाषणाच्या प्रक्रियेत उमटल्याचे मानले जात आहे. दरम्यान, केरळ विधानसभेत विरोधकांच्या भूमिकेत असणाऱ्या कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने राज्यपालांच्या कृतीवर टीकेची झोड उठवली. अभिभाषणातील केवळ अखेरचा परिच्छेद वाचण्याची कृती विधानसभेचा अवमान करणारी आहे. राज्यपाल आले आणि रॉकेटसारखे निघून गेले. जाताना त्यांनी आमच्याकडे साधा कटाक्षही टाकला नाही. सगळीच प्रक्रिया एकप्रकारची थट्टाच मानावी लागेल. अशा प्रकारची वर्तणूक मान्य केली जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया विरोधकांनी दिली.
राज्य सरकारच्या मंजुरीने तयार झालेले अभिभाषण राज्यपाल वाचून दाखवतात. केरळ सरकारच्या धोरणात्मक बाबींवर आधारित त्या अभिभाषणात राज्याविषयी असणाऱ्या केंद्र सरकारच्या आर्थिक दृष्टीकोनावर टीका करण्यात आली आहे.