शिराळा – परंपरागत चालत आलेल्या गोष्टी सरकारने जपल्या पाहिजेत. भाजप सरकार हे संस्कृतीला जपणारे सरकार आहे. शिराळ्यात नागाला कोणत्याही प्रकारे इजा केली जात नाही, अथवा मारले जात नाही. त्यामुळे राज्य सरकार यावर मार्ग काढेल, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली.
शिराळा येथे प्रहार संघटनेचे शिराळा तालुकाध्यक्ष श्रीराम नांगरे यांच्या घरी आ. बच्चू कडू यांनी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रहारचे शिराळा तालुकाध्यक्ष श्रीराम नांगरे, अक्षय क्षीरसागर, ऋषी घोडे, अजिंक्य कोळी, ऋषिकेश गायकवाड, शशिकांत पाटील, दिग्विजय पाटील, अनुसया पाटील, सुनिता कांबळे उपस्थित होते. आ. बच्चू कडू म्हणाले, सर्वत्र पावसाने ओढ दिल्याने उत्पादनात घट झाली, तर शेतकऱ्यांना सरकार मदत करेल. आपली जनावरे चरण्यासाठी वन विभागाच्या हद्दीत जातात. त्यावेळी अनेक कायदे लावून गुन्हे दाखल केले जातात. परंतु, वन क्षेत्रातील वन्य प्राणी आपल्या हद्दीत येतात. त्यासाठी कोणताही कायदा नाही. याच्यावर आता काम करणे आवश्यक असून यासाठी शेतकऱ्यांनी संघटीत होण्याची गरज आहे.
ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विकासाची गती व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नीती या संगमामुळे तिसरे इंजिन आपोआप जोडले गेल्याने सरकारला मजबुती मिळाली आहे. आता कॉंग्रेसही सत्तेत सहभागी होईल. दरम्यान, तिसरे इंजिन जोडल्याने नाराजी नाही; पण शिवसेनेच्या सर्व आमदारांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अर्थमंत्रिपद देऊ नका, असा सूर होता. त्यावेळी मुख्यमंत्री वेगळे होते; परंतु आता मागे झाले तसे होणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार असले काय आणि इतर कोणी असले, तरी आम्हाला फरक पडणार नाही, असेही आ, कडू यांनी सांगितले.
ते म्हणाले, उसाची एफआरपी ठरवताना फक्त कारखान्यांमधील साखर उत्पादन विचारात न घेता, इतर उपपदार्थ निर्मितीचेही उत्पादन गृहीत धरून, एफआरपी ठरवली पाहिजे, याबबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडणार आहे. कारखान्यातून तयार होणाऱ्या मालाचे दर वाढले, तर कोणी काही बोलत नाही. मात्र, शेतमालाचे दर वाढल्यावर ओरड सुरू होते. अशा प्रवृतीचा आम्ही निषेध करतो, अशा तीव्र भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरच मंत्रिपदाचा निर्णय
मंत्रिमंडळ विस्तार व आपल्या मंत्रिपदाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार बच्चू कडू म्हणाले, मी मंत्रिपद घ्यायचे की नाही, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे. त्यानंतरच मंत्रिपदाबाबत निर्णय जाहीर करणार आहे.