अरुण पवार
पाटण – पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड तालुक्यातील साजूर ते कोयना भागातील नवजा-हेळवाक पर्यंतचा मोठा रस्ता राज्यमार्ग म्हणून मंजूर करून आणला. रस्त्यासाठी कामासाठी आत्तापर्यंत कोठयावधी रुपये खर्च करण्यात आलेत. तरीसुद्धा चालू पावसाळ्यातच या रस्त्याची दैना उडाली असून बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने ठेकेदारांनी जागोजागी रस्त्यावरील कामे अर्धवट ठेवली आहेत. काही ठिकाणी काम केलेल्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. कुसरुंड नजीक रस्त्याची कामे अर्धवट ठेवल्यामुळे मातीचा रस्ता आणि त्यात चिखलाचा सडा अशी राज्यमार्गाची परिस्थिती झाली आहे.
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जाते. त्यामुळे कराड-चिपळूण मार्गावर पुराचे पाणी येऊन वाहतूक खोळंबते. याला पर्यायी व्यवस्था म्हणून ना. देसाईंनी साजूर ते नवजा-हेळवाक रस्त्याला राज्यामार्गासाठी कोठयावधींचा निधी मंजूर करून आणला. परंतु, बरीच कामे अर्धवट असल्याने रस्त्याची दैना झाली आहे. याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत या नवीन राज्यमार्गाच्या कामाची कवालिटी कंट्रोलकडून तपासणी करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. तालुक्यात सन 2005-06 साली कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यानंतर अतिवृष्टीला सुरुवात झाल्याने नाईलाजास्तव प्रशासनाला कोयना धरणातून प्रति सेकंड एक लाख क्युसेक पाणी नदीपात्रात सोडावे लागले होते. त्यामुळे कराड-चिपळूण रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पुराचे पाणी आले होते. अशा परिस्थितीत कराड-चिपळूण वाहतूक बरेच दिवस बंद होती. त्यानंतरही वर्षानुवर्षे असाच अनुभव येऊ लागल्यामुळे पाटणचे आमदार आणि सध्याचे विद्यमान मंत्री शंभूराज देसाई यांनी कराड-चिपळूण रस्त्याला पर्याय रस्ता म्हणून तांबवे फाटा मार्गे साजूर ते हेळवाक-नवजाचा पर्याय मार्ग निवडून रस्त्याचे काम ही सुरू केले.
सुरुवातीला सर्वे करून या रस्त्याचे काम प्राथमिक स्वरूपात सुरु करण्यात आले. मात्र, लांब पल्याच्या अवजड गाड्या-वाहने या अपुऱ्या रस्त्यावरून मार्गक्रमण करू शकणार नाहीत. हे लक्षात आल्यानंतर ना. देसाई आणि प्रशासनाने नवजा-हेळवाक-साजूर रस्त्याला राज्यमार्ग म्हणून मंजुरी मिळवली. त्यानंतर रस्त्यावर कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवून रस्त्याचे जलद गतीने काम करण्यासाठी अनेक ठेकेदार नेमूनत्यांना कामे वाटून देण्यात आली.
हा लांब पल्याचा मोठा रस्ता असल्यामुळे आणि या रस्त्यावर साजूर, गारवडे, मारूल हवेली, पापडे खुर्द, सांगवड, बहुले, गव्हाणवाडी, सोनवडे, सुळेवाडी, कुसरुंड, नाटोशी, मोरगिरी, माणगाव, गुंजाळी, किल्ले मोरगिरी, मनेरी, लेंडोरी, मेंढेघर, कुसवडे, झाकडे अशी हेळवाक-नवजापर्यंतची अनेक गावे येतात. सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुद्धा या रस्त्यासाठी प्रयत्न करून सुरुवातीला पंतप्रधान सडक योजनेतून निधी उपलब्ध करून घेतला होता. एवढे करूनदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग व त्यांचे अधिकारी, कर्मचारी व नेमून दिलेय ठेकेदारांचे मोठ्या प्रमाणात साठे-लोटे असल्यामुळे रस्त्याचे काम आजअखेर निकृष्टच आहे. आजही रस्त्याची पाहणी केल्यास जागोजागी बऱ्याच ठिकाणी रस्त्याची व फरशी पुलाची कामे झालेली नाहीत.
रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील नाले काढण्यात आले नसून जागोजागी अतिक्रमणांनी रस्त्याला वेडलेले आहे. काही ठिकाणी कच्चा रस्ता असतानाही रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून ठेकेदारांना त्यांच्या कामाची लाखो रुपयांची बिले काढून देण्यात आली आहेत. याबाबत सखोल चौकशी करून रस्त्याचे काम पुन्हा दर्जेदार करून घेण्यात यावे, अशी मागणीही जनतेतून होत आहे.