करोना विषाणूचा फैलाव आणि लागू करण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे एरवी रात्रभर जागणारी शहरे दिवसा झोपल्यासारखी शांत झाली. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या परिस्थितीत हळूहळू परिवर्तन होत गेले. सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा अनेक छोट्या-मोठ्या शहरांमधून सुरू होत आहेत. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागला आहे, तर काही ठिकाणी नियमांचे पालन करून सार्वजनिक वाहतूकसेवा सुरू झाल्या आहेत; परंतु परिस्थिती पूर्ववत होण्यास अजून किती दिवस लागतील हे जगभरात कुणालाच समजलेले नाही.
जगातील अनेक देशांमध्ये सार्वजनिक वाहतूक सुविधा सुरू आहेत. परंतु तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. प्रत्येक आसनावर ठराविक लोकच बसून प्रवास करतात. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात हे शक्य आहे का? या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर आपल्याला घरी परतणाऱ्या मजुरांसाठी खास रेल्वेगाड्या सोडल्या गेल्या, त्याच वेळी मिळाले आहे. आता तर असा प्रश्न उभा राहिला आहे की, सार्वजनिक परिवहन सेवा पूर्वीसारख्या कधी सुरू होतील? मुळात त्या तशा स्वरूपात सुरू होऊ शकतील का? कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी भारतातील सर्व सार्वजनिक वाहतूक सुविधा बंद होत्या.
महाराष्ट्रात एसटी बसेस बंद आहेत. एसटी बसेसमधील आणि बसस्थानकांवरील गर्दी आपल्या परिचयाची आहे. परंतु आता बरीच बसस्थानके ओस आहेत. सध्या काही सरकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सुविधा पुरविणारे लोक बसेसमधून प्रवास करताना दिसत असले तरी बसच्या प्रत्येक आसनावर एकच प्रवासी बसल्याचे दिसते. ही तात्पुरती उपाययोजना झाली. परंतु जेव्हा सर्वच क्षेत्रांमधील काम पूर्ण क्षमतेने सुरू होईल, तेव्हा कामाच्या ठिकाणी नियम पाळले जातील; परंतु सार्वजनिक वाहतूक सेवेचे काय? तिथे नियम कसे पाळणार? हा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर आजमितीस कुणाकडेच नाही. आपल्याला सार्वजनिक बससेवा, उपनगरी रेल्वेगाड्या, मेट्रो अशा सर्वच ठिकाणी प्रवासाचे काही नियम तयार करावे लागणार आहेत. या सुविधांची मांडणीच नव्याने करावी लागणार आहे. कामाची वेळ ठरलेली असल्यामुळे ठराविक वेळी गर्दी होणे अपरिहार्य आहे. अशा वेळी काय करायचे, हा प्रश्नच आहे.
एकमेकांपासून अंतर ठेवून आरामदायी प्रवास करणे हे बस-लोकलला लटकून प्रवास करणाऱ्यांचे एक स्वप्नच आहे. करोनानंतरच्या काळात अशा प्रकारे नियम पाळून प्रवास करायचे ठरविल्यास गाड्यांच्या संख्येत कितीतरी वाढ करावी लागेल. मर्यादित साधनांच्या मदतीने सार्वजनिक वाहतूक सुविधा सुरळीत करणे हे मोठे आव्हान असणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून आपल्या सेवांची रचना अशा प्रकारे केली जाते, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना एकाच वेळी घेऊन जाता येईल. आता नेमके त्याच्या उलट करावे लागणार असून, पर्याय मर्यादित आहेत. आपल्याकडे सार्वजनिक वाहतूक सुविधा हे कोविड-19 च्या प्रसाराचे प्रमुख साधन ठरू शकले असते; परंतु त्या वेळीच बंद करण्यात आल्या म्हणून मोठा धोका टळला, असेच म्हणावे लागेल. परंतु आता या सुविधा पुन्हा सुरू कशा करायच्या, त्याचे टप्पे काय असतील आणि इतर कार्यक्षेत्रांबरोबर या सेवांचा ताळमेळ कसा बसवायचा, याचा नव्याने विचार करावा लागणार आहे.
प्रवास करताना संबंधितांना “कोविड सुरक्षा प्रमाणपत्र’ही सोबत ठेवावे लागेल. कारण प्रवास करणाऱ्यांना सुरक्षिततेची हमी नसल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असेल आणि त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी असे प्रमाणपत्र आवश्यक असेल. सरकारकडून बसेस आणि महानगरे यांच्याविषयी सुरक्षा प्रोटोकॉल तयार करावे लागतील. वाहनांवर सुरक्षा प्रतिबंध आणावे लागतील. लॉकडाऊन संपवून आपण जेव्हा अनलॉक-1 च्या प्रक्रियेत प्रवेश केला, तेव्हाच शहरांमध्ये अशा प्रकारची काही मानके निश्चित करणे गरजेचे होते. काही नियम करण्यात आलेही. परंतु नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी करणारी यंत्रणा आपल्याकडे अपुरी आहे, हे दिसून आले आणि अनेक ठिकाणी केवळ नियमभंगांमुळे पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागला.
केवळ सार्वजनिक वाहतूकच नव्हे तर एकंदरीत वाहतुकीचे स्वरूपच कोविड-19 नंतर बदलणार आहे. अनेकजण सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा आधार घेण्याऐवजी स्वतःचे चारचाकी किंवा दुचाकी वाहन वापरण्यास पसंती देतील. अनलॉकच्या प्रक्रियेदरम्यान हे दिसूनही आले आहे. दुचाकीवरील प्रवास स्वस्तही असून, काहीजण खात्रीशीर जोडीदार सोबत घेऊन इंधनाचा खर्च वाटून घेतील; पण बस किंवा लोकलऐवजी दुचाकीलाच पसंती देतील अशी स्थिती येणार आहे. अशा वेळी दोन समस्या प्रामुख्याने उभ्या ठाकतील. एक म्हणजे, रस्त्यावरील वाहनांची गर्दी वाढून वाहतूककोंडीची स्थिती वारंवार उद्भवेल आणि दुसरी समस्या म्हणजे, यामुळे वायुप्रदूषणात प्रचंड वाढ होईल.
लॉकडाऊनमुळे जे स्वच्छ पर्यावरण आपल्याला पाहायला मिळाले, ते काही दिवसांतच पुन्हा गढूळ आणि धुरकट होऊन जाईल. अनेक शहरांतील नागरिकांनी तर लॉकडाऊनकडे इष्टापत्ती म्हणूनच पाहिले आहे. वायू आणि जलप्रदूषणाचा स्तर घटल्याचे सर्वांनी डोळ्यांनी पाहिले आहे; परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच या साऱ्याचा विसर पडला आणि वाहतुकीची कोंडी हा रोजचा प्रश्न बनला. जेव्हा सर्व क्षेत्रे पूर्ण क्षमतेने सुरू होतील तेव्हाची परिस्थिती काय असेल, याचा विचार आताच करून ठेवलेला बरा.
अनलॉकच्या काळात दिल्लीसारख्या शहरांत प्रत्येक बसमध्ये सरासरी वीस लोक प्रवास करताना दिसले तर मुंबईमध्ये ही संख्या अधिक होती. पर्याय मर्यादित असणे हेच त्यामागील कारण आहे. सार्वजनिक वाहतूक प्रणाली पूर्ववत करण्यासाठी टप्प्याटप्प्यानेच पुढे जावे लागेल. प्रवाशांना या साधनांमधून प्रवास करणे सुरक्षित वाटायला हवे असेल तर या प्रवासामुळे विषाणूंचा प्रसार अजिबात होता कामा नये.
वाहतूक साधनांची आसनक्षमता, वारंवारिता, स्वच्छता आणि कार्यक्षमता वाढविण्याचे आव्हान यंत्रणांसमोर असणार आहे. हे आव्हान खडतर तर आहेच; परंतु काही बाबी अशक्य असल्याचे सध्या तरी दिसते आणि सुधारणा घडवायच्या असतील तर सध्याची परिस्थिती स्वीकारावी लागेल. काम एकट्या यंत्रणांचेच आहे असे नाही. सुरक्षित प्रवास ही नागरिकांचीही जबाबदारी असणार आहे.