“केल्याने देशाटन मनुजा येते शहाणपण’ असे म्हटले जाते; पण खरे तर जसजसे आपण प्रवास करतो, विविध अनुभव घेतो, वेगवेगळ्या व्यक्तींना भेटतो तसतसे आपल्याला अजूनपर्यंत बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या आणि अजून खूपच शिकायचे आहे, ही जाणीव तीव्रतेने होते. कदाचित यामुळे जी नम्रता येते हेच खरे शहाणपण असावे.
अपर्णा अभ्यंकर
एखाद्या ट्रिपवरून आल्यावर लगेच एक दोन दिवसात ट्रिपचा अनुभव लिहून काढायचा हा माझा शिरस्ता. आमची राजगड मोहीम तर फत्ते झाली होती पण त्याचा इतिवृत्तांत लिहिण्यास माझ्याकडून थोडा वेळ गेला. दिरंगाईच म्हणा ना! पण तेवढ्यातच आमच्या धवल रामतीर्थकर या सहकाऱ्याने अतिशय विस्तृत तरीही नेटका असा ब्लॉग आमच्या सहलीविषयी लिहिला. आता मी वेगळे काय लिहिणार असा प्रश्न मला पडला. पण “पिंडे पिंडे मतिर्भिन्न:’ त्यांना कदाचित काही उत्तम गोष्टी समजल्या ज्या माझ्या कधीच लक्षात आल्या नसत्या; तसेच मलाही काही वेगळ्या गोष्टी दिसतील, जाणवतील, मांडता येतील. कारण एकूण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो तसेच प्रत्येकाची अनुभूती वेगळी असते. ह्याच विचाराने एक अनोखी ऊर्जा माझ्या अंगात संचारली आणि तो दिवस एखाद्या चित्रपटाप्रमाणे माझ्यासमोर उलगडू लागला.
राजगडची सहल ठरली तेव्हाच आमच्या ग्रुप लीडर शंतनूने आम्हाला कळवले होते की, आपण शक्य तेवढ्या लवकर निघू कारण राजगड चढायला तसा कठीण व दमछाक करवणारा आहे. त्यात एका दिवसात शक्य तेवढा राजगड आम्हाला करायचा होता. त्यामुळे आम्ही राजगडाची नेहमीपेक्षा एक तास आधी ट्रिपची सुरुवात केली. आमच्या सवंगड्यांना वाटेवर घेत घेत आम्ही लवकरात गावकर नसरापूर फाटा गाठला. अशा ठिकाणांना पोचायला थोड्याफार अरुंद आडवाटा पार करायला लागतात. त्या पार करत आम्ही राजगडाच्या पायथ्या जवळच्या एका हॉटेलमध्ये आलो. या वेळेस पोहे आणि सॅंडविच अशी शिदोरी आम्ही पुण्यातूनच घेऊन निघालो होतो. त्यामुळे तिथे खाण्यात फार वेळ गेला नाही आणि आम्ही लवकरच राजगडाच्या दिशेने मार्गस्थ झालो. पायथ्याशीच आम्हाला मुंबईचा ग्रुप येऊन मिळाला. नेहमीप्रमाणे आम्ही सर्वांची ओळख करून घेत होतो, विविध वयोगटातले, विविध क्षेत्रातले व्यक्ती आमच्या गटात होते. या वेळच्या
आमच्या ट्रिपचे वैशिष्ट्य म्हणजे दुर्गतज्ञ आणि प्रसिद्ध इतिहास संशोधक सचिन जोशी आमच्याबरोबर होते. आतापर्यंत फक्त युट्युब किंवा पुस्तकाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. आज त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी आम्हाला मिळत होती.
वाटेत गरज पडेल तसे, काही ठिकाणी थांबत, कधी पाणी पीत तर कधी ग्लुकॉनच्या गोळ्या चघळत आमची चढण सुरु होती. बराचवेळ चालल्यावर आमची आपापसात चर्चा झाली आता चढण संपतच आली असेल ना? तेवढ्यात एका अनुभवी ट्रेकरने आम्हाला कानपिचकी दिली, “अरे अजून अर्धी सुद्धा चढण झाली नाहीये. चला पटापट.’
ते ऐकताच परत आम्ही पुढे चालू लागलो. पायऱ्या सुरु झाल्या की, राजगड आलाच असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात पायऱ्या खूप उंच असल्याने त्या चढायला तशा कठीण आहेत. थोडे अंतर चालल्यावर पाली दरवाजा खालून दिसायला लागला आणि मग मात्र सर्वांना हुरूप आला, आणि झटझट पावले टाकत आम्ही दरवाज्याजवळ आम्ही पोचलो. महाराजांच्या अगदी सुरुवातीच्या काळात बांधलेल्या किल्ल्यांपैकी एक असल्याने बाकीच्या किल्ल्यांवर दिसतात तसे गोमुखी दरवाजे इथे नाहीत. वर येताना पाली दरवाजा सहज दिसून येतो. या दरवाज्यातून थेट समोर तोरणा दिसतो.
तिथून पुढे आम्ही सदरेवर आलो. शिवरायांच्या प्रथम पतकी सईबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतले. या समाधी जवळ एक पुरातन दीपमालाही आहे. समाधीच्या समोर पद्मावती देवीचे मंदिर आहे तिथे सर्व जण दर्शनाला गेलो. राजगडावर बरेचजण या मंदिरतच मुक्काम करतात.
आम्ही सर्व आज्ञाधारक विद्यार्धी जोशी सरांच्या भोवती कोंडाळे करून बसलो. नेहमीचे ट्रेकर्स काही काही प्रश्न विचारत होते. आम्ही मात्र श्रवणभक्ती करत होतो. पद्मावती देवी मंदिरात एक मूळ मूर्ती (जी पूर्वी पूजेत असावी) आहे आणि समोर दर्शनासाठी जरा घडीव अशी काळ्या पाषाणातील मूर्ती तिथे आहे. पेशवेकालीन रचना दाखवणारे लाकडी खांबही तिथे आहेत.
पद्मावती देवीचे दर्शन घेऊन आल्यावर बाहेर जोरदार चर्चा सुरु झाली, “कोण बालेकिल्ल्यावर जाणार आणि कोण संजीवनी माचीवर जाणार?’ बालेकिल्ला चढायला कठीण अगदी नवख्या ट्रेकर्सने तो करू नये. पण “अभी नही तो कभी नही…’ या तत्वानुसार आम्ही बालेकिल्ल्याची निवड केली.
काही मोजके लोक वगळता बालेकिल्ल्याचे धाडस करायला सगळे तयार झाले. उभी चढण, त्यातले तीन अवघड रॉक पॅचेस आणि त्यात आम्ही गिर्यारोहणात अगदीच नवखे (लोहगड, सिंहगड आणि बालेकिल्ला यात फार अंतर आहे.) अगदी डोळ्यात तेल घालून पूर्ण एकाग्रतेने आम्ही हा बालेकिल्ला चढत होतो. सुरवातीलाच एक अवघड रॉक पॅच होता पण वरून खाली येणाऱ्या एका ट्रेकरने आम्हाला योग्य त्या सूचना देऊन वर चढायला शिकवले आणि वर खेचून घेतले. या पुढे एक अर्धा किलोमीटरची अरुंद पायवाट होती. इथे मधमाश्यांची पोळी आहेत. त्यामुळे तिथून चालताना अतिशय शांततेत चालावे लागते. कोणत्याही प्रकारचा आवाज करून चालत नाही. आम्ही हात व चेहरा जॅकेटने झाकून शांतपणे हा टप्पा पार केला. वरच्या भागातल्या रेलिंगला धरून आम्ही पुढचे दोन टप्पे पार केले. आमच्या टीम मधले एक्स्पर्ट ट्रेकर्स कौस्तुभ, डॉक्टर चैतन्य, विधाते सर, घांग्रेकर तसेच मुंबई टीमचे अमित, योगेश हे आम्हाला मदत करत होतेच.
बालेकिल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महालाचे अवशेष बघायला मिळतात. बालेकिल्ल्यावरून सुवेळा माचीचा अप्रतिम नजारा; तसेच भाटघर धरणाचे बॅकवॉटर बघता येते. बालेकिल्ल्याचा बांधकाम 1642 ते 1662 या दरम्यान झाल्याचे इतिहासतज्ज्ञ सांगतात. याच किल्ल्यातून जिजामातांनी सिंहगडावरील परकीयांचा निशाण बघितला आणि त्यांना तीव्र दुःख झाले आणि महाराजांच्या शूर सैनिकांनी आणि सरदार तानाजी मालुसरेंच्या मोठा पराक्रम गाजवून तो किल्ला परत स्वराज्यात सामावून घेतला, हा इतिहास आपण वाचला आहेच. “आधी लगीन कोंढाण्याचं’ म्हणत जिथे तानाजी मालुसरेंनी राजमाता जिजाबाई आणि शिवाजी महाराज यांच्या साक्षीने किल्ला जिंकण्याची शपथ घेतली, त्याच जागी आज आपण उभे आहोत या विचारानेच आम्हाला खूप भरुन आले. ब्रह्मर्षी देऊळ, विविध बुरुज तसेच विविध तलाव पाहून आम्ही बालेकिल्ला उतरायला सुरुवात केली.
बालेकिल्ला फत्ते झाल्यावर आपण काहीतरी महान कर्तृत्व गाजवले आहे, अशा थाटात मी परत त्या उभ्या चढणीकडे बघितले आणि बघते तर काय एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा झपाट्याने बालेकिल्ला सहज उतरत एक 80 वर्षाच्या आजीबाई झरझर येत होत्या. आमच्या गर्वाचं घर इतक्या लवकर खाली होईल, असं आम्हाला वाटलं नव्हतं. त्या ससून मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आहेत असं कळलं. त्यांच्या बरोबर “सेल्फी तो बनता है’ असं म्हणून आम्ही आळीपाळीने फोटो काढून घेतले. खाली येताच सर्वजण सदरेवर जमलो. तोपर्यंत दुसरा ग्रुप सुद्धा संजीवनी…
माची करून परत आला होता. राजगडाच्या दर्शनाने मन अगदी तृप्त झालं होतं त्या नंतर फक्त भुकेची वेळ आहे म्हणून सर्व जण शिदोऱ्या सोडून जेवायला बसलो. मडक्यातलं दही आणि बरोबर आणलेले पराठे यामुळे आता पोटोबाही निवांत झाले होते.
राजगड पूर्ण पाहायचा असेल, पूर्णपणे अनुभवायचा असेल तर खरं म्हणजे तीन दिवस हवेत आणि आम्ही तर एका दिवसात परत जाणार होतो. थंडीत अंधारही लवकर पडतो त्यामुळे जेवणानंतर लगेचच आम्ही परतीच्या वाटेला सुरुवात केली. खाली उतरताना आमचा वाढलेला आत्मविश्वास आम्हाला जाणवत होतं. खाली एका चहाच्या टपरीवर सगळेजण थांबलो. टपरीवर चहा आणि वडापाववर सर्वांनी मस्त ताव मारला. आमच्यापैकी कोणाचा पाय मुरगळला होता, कोणाला कॅम्प्स येत होते; पण राजगड चढून, भटकून एक अनोखा उत्साह टीममध्ये संचारला होता. गाडीत चढायच्या आधी डॉ. चैतन्य व मिलिंद परांजपे यांनी आम्हाला काही स्ट्रेचेस शिकवले. त्यामुळे परतीच्या प्रवासाला सगळे सज्ज झाले.
संपूर्ण ट्रेकभर जाणवलेली मौल्यवान गोष्ट म्हणजे टीमवर्क. ग्रुपमधला प्रत्येक मेंबर आपापल्या परीने एकमेकांना मदत करीत होता. “मी माझ्या पुरते बघेन, तुमचे तुम्ही बघा’ अशा दृष्टीकोनाला तिथे थाराच नव्हता. आणि हेच आमच्या यशस्वी ट्रेकचे गमक आहे. या ट्रेकने मला काय दिले? तर निखळ आनंदात घालवलेला एक दिवस, शाळेत कधीही न वाचलेल्या, माहिती नसलेल्या अनेक ऐतिहासिक गोष्टी, पुरेपूर आत्मविश्वास, उत्तम गटकार्य आणि निसर्गाचा अमूल्य सहवास.