अलिबाग – रायगड जिल्ह्यात वनविभागाकडून केलेल्या प्रयत्नांमुळे वनक्षेत्रात वाढ झाली आहे. सामाजिक वनीकरण आणि पश्चिम घाटाचा भाग असलेल्या रायगड जिल्ह्यात वृक्षतोडीचे प्रमाण कमी ९० टक्क्यांवरूव २० टक्क्यांवर आल्यामुळेही वनक्षेत्र बहरू लागले आहे. त्यामुळे या क्षेत्रात गिधाडे, गवे, नीलगाय, सांबर, चितळ आदी प्राण्यांचे पुन्हा आगमन झाले आहे.
निसर्गप्रेमी, सर्पमित्र आणि सिस्केपसारख्या वन्यजीव संस्थांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे रायगडमधील वनचित्र पालटले आहे. पूर्वी मांडूळ, घोरपड, खवलेमांजर यासारख्या सरपटणारे प्राणी तस्करीत सापडायचे. आता तस्करीमध्येही घट झाल्याचा वनविभागाने दावा केला आहे.
रायगड जिल्ह्यातील एकूण १७२५.४४ चौरस किलोमीटर वनक्षेत्रापैकी १३४.६५ चौरस किमी क्षेत्र राखीव आहे. यात फणसाड वन्यजीव आणि कर्नाळा पक्षी अभयारण्याचा समावेश आहे. अभयारण्य परिसरातील लोकांमध्ये वृक्षतोडीबाबत झालेली जनजागृती, वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत उपाययोजनांमुळे वन्यप्राण्यांची संख्या तीन वर्षांत १५ टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज आहे.
माथेरान, कर्नाळा, फणसाड यांसारख्या अभयारण्यांमध्ये प्रचंड वनसंपदा आहे. हिरवीगार झाडे, विविध प्रजातींच्या पशुपक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी अभ्यासक, पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे शिवाय जमेची बाब म्हणजे वनसंवर्धनाची मानसिकता वाढू लागली आहे. कांदळवन क्षेत्रात उपजीविकेची साधने निर्माण करण्याचा प्रयत्नही सुरू आहे.
रायगड जिल्ह्यातील जंगलात आजमितीस १७ प्रकारच्या सस्तन प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असणारा झुबकेदार शेपूट असणारा राज्यप्राणी शेकरूचे (मोठी खार) दर्शन येथील अभयारण्यांत होते. शेकरूची घरटी उंच झाडावर वैशिष्टपूर्ण अशी पानांनी मढलेली असतात.
फणसाडमध्ये भल्या पहाटे किंवा सायंकाळी अभयारण्यातील प्रमुख शिकारी प्राणी, बिबट्याचे दर्शन अनेकदा पर्यटकांना होते. भारतातील सर्वात मोठे हरिण-सांबर आणि जगातील सर्वात छोटे हरिण-पिसोरी हे दोन्ही याच अभयारण्यात आढळून येतात. एकमेव उडू शकणारा सस्तन प्राणी वटवाघळाची पॅटेड बॅट या प्रजातीची नोंद याठिकाणी करण्यात आली आहे.