लाखणगांव -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या दमदार पावसामुळे मंगळवार (दि. 30) सकाळी सर्वत्र धुके पसरले होते. या धुक्यांमुळे शेतीपिकांवर रोगराई पसरून फवारणीसाठी भांडवली खर्चात वाढ होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील देवगांव, लाखणगांव, पोंदेवाडी, अवसरी, काठापूर परिसरात सोमवारी (दि. 29) दुपारी आणि रात्री चांगला पाऊस झाल्याने खरीप पिकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे, तसेच पाणीभरणीला आलेल्या पिकांनाही पुढील सहा-सात दिवस पाण्याची गरज भासणार नाही; परंतु मंगळवारी सकाळी पडलेल्या धुक्यांमुळे अनेक तरकारी पिके पालेभाज्या यांच्यावर रोगराई पसरण्याची शक्यता आहे. रोगराई पसरू नये यासाठी फवारणी करावी लागणार आहे, त्यामुळे त्यांच्या भांडवली खर्चात वाढ होणार आहे.
सकाळी पसरलेले हे धुके पाहण्यास आल्हाददायक वाटत असले, तरी धुक्याचा फटका शेती पिकांना बसणार आहे. मागील सात ते आठ दिवस मोठ्या प्रमाणात ऊन जाणवत होते. उन्हामुळे होणारी उष्णता पावसामुळे काही प्रमाणात कमी झाली असून पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसाचा खरीप पिकांना फायदा होणार असला तरी तरकारी पिके आणि पालेभाज्यांवर धुक्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.