सोरतापवाडी -टिळेकरवाडी (ता. हवेली) येथे गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून, येथे लवकरात लवकर पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. टिळेकरवाडी येथे बिबट्याने दोन दिवसांत तीन कुत्री व एका बकरीचा फडशा पाडला आहे.
वन रक्षक जी. आर. म्हेत्रे आणि डी. एल. कोळपे, पोलीस पाटील विजय टिळेकर व ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. नागरिकांनी वनपाल वाय. यू. जाधव यांच्याकडे पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली असल्याचे म्हेत्रे व कोळपे यांनी सांगितले.
वनपाल जाधव यांच्याशी संपर्क केला असता लवकरच पिंजरा लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी रात्रीच्या वेळी फिरू नये, असे आवाहनही त्यांनी केले.