महाळुंगे इंगळे -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन केला आहे. त्यातही सोशल डिस्टन्सिंग महत्वाचे आहे. मात्र, चाकण शहरात ग्राहक व विक्रेत्यांकडून या नियमांना हरताळ फासला गेल्याने सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला आहे. त्यात अवैध वाहनचालकांनी वाहनांमध्ये भरमसाठ माणसे कोंबून भरल्याने वाहतुकीनेही कळस गाठला आहे.
चाकण येथे दर शनिवारी मोठा बाजार भरतो. मात्र, लॉकडाऊनमुळे किरकोळ बाजार वगळता कांदा व बटाट्याचा बाजार भरला नाही. मात्र, भाजीपाला विक्रेत्यांनी भाजी विकण्यासाठी चाकण-आंबेठाण रस्त्यावरील झित्राईमळा येथे भाज्या विकण्याकरिता ठाण मांडले होते.
त्यामुळे महिला, तरुणी, आदीनी मोठ्या प्रमाणात बाजार, किराणा माल, औषधे घेण्याच्या नावाखाली घराबाहेर जावून सोशल डिस्टन्सिंग पाळला नसल्याचे निदर्शनास आले. चाकण शहरातील नागरिकांनी भाजीपाला खरेदी करताना शासनाच्या नियमांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे बऱ्याच ठिकाणी दिसून आले.
अनेक खासगी वाहनचालकांनी मोठ्या संख्येने बाहेरगावी जाणाऱ्या लोकांना वाहनांच्या संख्येच्या मर्यादेपेक्षा जास्त लोकांना वाहनात कोंबून नेल्याचे दिसून आले.वाहतूक पोलिसांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्याने आंबेठाण चौक व तळेगाव चौकांमध्ये थोड्या प्रमाणात अवैध प्रवाशी वाहतूक सुरू आहे. गर्दी कमी करण्यासाठी रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.
चाकण व पंचक्रोशीतील निराधार, गरजू, गरीब, कामगार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती आणि दुर्धर आजारी रुग्ण तसेच पीडित व्यक्तींसाठी अस्मिता सेवा समितीतर्फे शिवभोजन थाळी ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. गरजूंनी याचा लाभ घ्यावा.
– किशोर शेवकरी, अस्मिता सेवा समितीचे अध्यक्ष