पिंपरी – देशभरात केलेल्या नोटबंदीमध्ये सामान्य नागरिक भरडला गेला. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जनता कर्फ्यू जाहीर केला. त्या दिवशी नागरिकांना घंटा, थाळी, टाळ्या वाजविण्यास सांगितले. आता घरातील विजेचे दिवे बंद करून गच्चीत मेणबत्ती लावा, मोबाइलचा लाइट लावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ही बाब जनतेची दिशाभूल करणारी आहे, असा आरोप पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केला आहे.
त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्या दिवशी नागरिकांना घरासमोर, गच्चीतून घंटा, थाळी, टाळ्या वाजविण्याचे आवाहन केले. नागरिकांना वाटले करोना गेला; पण संकट कायम राहिले. आता पंतप्रधानांनी 5 तारखेला रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी घरातील विजेचे दिवे बंद करून गच्चीतून मेणबत्ती, मोबाइल फ्लॅश लाइट लावण्याचे आवाहन केले आहे. जनता प्रचंड आशावादी आहे की काहीतरी जादू होईल आणि आपल्या देशावरील करोनाचे संकट टळेल. मुळात देशावर करोनाचे संकट का ओढावले याचा साकल्याने विचार करण्याची गरज आहे.
नोव्हेंबर-2019 मध्ये चीनमधून सुरू झालेली करोनाची साथ डिसेंबरपासून जगभरात पसरत असताना आपली उच्चस्तरीय जागतिक घडामोडीवर लक्ष देणारी यंत्रणा मात्र साखरझोपेत होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. करोनाच्या साथीबाबत वेळीच योग्य पाऊल उचलून केंद्र सरकारने आवश्यक निर्णय घ्यायला हवे होते.
केंद्र सरकारकडून नागरिकांच्या अपेक्षा
देशाच्या इतिहासात टाळेबंदीची प्रथमच नोंद झाली. अब्जावधीचे नुकसान झाले. अर्थव्यवस्था कोलमडून पडली. सामान्य माणूस जीवन-मरणाची लढाई मोठ्या धैर्याने लढत आहे. केंद्रशासनाने राज्यातील जनतेला पुढील 6 महिने मोफत अन्नधान्य पुरवठा करावा. वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यांना मोठा निधी उपलब्ध करून द्यावा.