नवी दिल्ली : देशाच्या एकूण आर्थिक स्थितीचे चित्र वित्तीय तूट किती प्रमाणात आहे यावर जोखली जाते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार नव्या आर्थिक वर्षातील वित्तीय तूट 6.8 टक्क्यांवर जाईल असा अंदाज मांडण्यात आला आहे.
चालू आर्थिक वर्षातील वित्तीय तूट मात्र तब्बल 9.5 टक्के इतकी होण्याची शक्यता आहे. एवढी प्रचंड वित्तीय तूट कशी भरून काढायची हीच सरकारपुढील सर्वात मोठी डोकेदुखी असणार आहे. वित्तीय तूट साडे तीन टक्क्यांपर्यंत राखण्याची कसोशी सरकारकडून सुरवातीला दाखवण्यात आली पण नंतर मात्र सरकारची बंभेरी उडालेली दिसून येत आहे. करोनाच्या काळात जो मोठा आर्थिक फटका बसला आहे त्याच्या झळा मोठ्या प्रमाणात केंद्राच्या तिजोरीलाही बसल्या आहेत. त्यामुळेच ही तूट चालू आर्थिक वर्षात तब्बल साडे नऊ टक्क्यांवर गेली आहे. पुढील चार वर्षात आम्ही ही तूट साडे चार टक्क्यांवर आणू अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली. चालू आर्थिक वर्षातील उर्वरीत दोन महिन्याच्या काळासाठी सरकार ही तूट भरून काढण्यासाठी 80 हजार कोटी रूपयांचे कर्ज घेईल असे त्या म्हणाल्या.